महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – संगमनेरमध्ये सुरू असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या तपासासंदर्भात सातत्याने संशय व्यक्त होत असताना आता शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका चोरीचा तपास शंकास्पद झाल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात आरोपीकडून चोरीचे सोने विकत घेतलेल्या सोनारांना पोलिसांनी सहआरोपी न करता क्लीन चीट दिल्याने या सोनारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी संगमनेरातील तरुणाने उपोषणाचा इशारा दिला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांपर्यंत हे प्रकरण जाऊन पोहोचल्याने आता या प्रकरणात नेमके काय घडते याकडे लक्ष लागले आहे.
संगमनेरमध्ये घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा तपास लावण्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांची असताना या तपासात वरिष्ठ कार्यालयाकडून सातत्याने हस्तक्षेप होत असल्याचे दिसते. यात नगर एलसीबी अग्रभागी असते. या एलसीबीचे अनेक किस्से शहरात सातत्याने चर्चिले जातात. आता पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या कार्यालयातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेला शंकास्पद सोने चोरी तपास समोर आला असल्याने या दोघा कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अकील नजीरखान पठाण (रा. इस्लामपुरा, संगमनेर) यांनी या संदर्भात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांना निवेदन दिले आहे. शहरातील रहेमतनगरमध्ये घरफोडीचे प्रकार समोर आले होते. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र संगमनेर शहर पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास लागत नसल्याने हा गुन्हा पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडे तपासासाठी घेण्यात आला होता.
पोलीस उपाधीक्षक वाघचौरे यांच्या कार्यालयातील दोन पोलीस कर्मचारी या प्रकरणाचा तपास करत होते. त्यांच्या तपासामध्ये या प्रकरणात दोन आरोपी निष्पन्न झाले. यातील मुख्य आरोपी इमरान शेख याला अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली देत रोकड रकमेसह सोन्याची चोरी केल्याचे कबूल केले.
तसेच चोरीचे हे सोने शहरातील काही सोनारांना विकल्याचे देखील त्याने सांगितले. त्यावरून चोरीचे सोने घेतल्याप्रकरणी पोलीस उपाधीक्षक कार्यालयाने संगमनेरमधील त्या चार सोनारांची चौकशी देखील केली. सोनारांच्या चौकशीचे हे प्रकरण विविध कारणामुळे बहुचर्चित ठरले होते. त्यामुळे आता अकील पठाण यांनी या सोनारांना सहआरोपी का करण्यात आले नाही असा सवाल उपस्थित करत पोलीस महानिरीक्षकांनी विशेष पथक नेमून या गुन्ह्याचा फेरतपास करावा, तसेच चोरीचे सोने घेण्यामध्ये सामील असणाऱ्या त्या सोनारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

पठाण यांनी दिलेल्या निवेदनात अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. या गुन्ह्यात पोलिसांना आरोपी सापडण्यात यश मिळाले होते. या आरोपींनी तीस तोळे सोने चोरले असल्याची कबुली दिली होती. यातील काही सोने हे संगमनेर शहरात विकले असल्याची कबुलीदेखील त्यांनी दिली होती. यामध्ये शहरातील चार सोनारांचा चोरीचे सोने विकत घेण्यात सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या चारही सोनारांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या नासिकमधील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
पठाण यांच्या निवेदनानंतर संगमनेर शहर पोलीस आणि पोलीस उप अधीक्षकांच्या कार्यालयातील पोलीस कर्मचारी यांनी नेमका कोणता तपास केला आणि या तपासाचे पुढे काय झाले? असे सवाल उपस्थित होत असून अद्यापही चोरीचे सोने घेणाऱ्या संशयित आरोपींवर गुन्हा दाखल का केला जात नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

