महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – निर्दयतेने कत्तलीसाठी वाहतूक होत असलेली ३२ जिवंत गोवंश जनावरे संगमनेर पोलिसांनी पकडली असल्याने या गोवंश जनावरांना जीवदान मिळाले. पोलिसांनी या कारवाईत जिवंत जनावरांसह ३ लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
दरम्यान या संदर्भात रिहान अल्ताफ शेख (वय १९, तीन बत्ती चौक, संगमनेर) याच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस नाईक राहुल कचरू डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव-पोहेगाव रस्त्याने तळेगाव दिघे मार्गे एका पीकअप मधून कत्तलीसाठी जिवंत जनावरांची निर्दयतेने वाहतूक केली जात असल्याची माहिती शनिवारी दुपारी संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल कडलग, पोलीस शिपाई राहुल सारबंदे यांच्यासह पंचांना कारवाईसाठी पाठविले. पोलीस कर्मचाऱ्यांचे पथकाने खाजगी वाहनाने जात तळेगाव दिघे येथील महाराजा पॅलेस व संस्कृती मंगल कार्यालय येथे संशयित वाहन पकडण्यासाठी सापळा लावला.


पावणे चार वाजण्याच्या सुमारास संशयित पिकअप (नं. एम. एच.१२ एफ. डी. २४५६) पकडत तिची तपासणी केली असता त्यामध्ये निर्दयतेने बांधून ठेवलेली ३२ गोवंश जनावरे आढळून आली. पिकअप चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. कत्तल करण्याच्या उद्देशाने या जिवंत गोवंश जनावरांची वाहतूक केले जात असल्याची खात्री पटल्यानंतर पोलीस पथकाने संबंधित पिकअप आणि चालकाला संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आणले.
कारवाईत पोलिसांनी सुमारे ६२ हजार रुपये किमतीच्या ३१ वासरांची व १५ हजार रुपये किमतीच्या एका जर्सी गायीची सुटका केली असून अडीच लाख रुपये किमतीची महिंद्रा मॅक्स पिकअप जप्त केली आहे. आरोपी रिहान शेख याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९५ चे सुधारीत २०१५ चे कलम ५(क) ९(अ) व प्राण्यांना निर्दयतेने वागविणेस प्रतीबंध कायदा कलम ३, ११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती उपाधीक्षक वाघचौरे यांनी दिली.

