महाराष्ट्र संवाद न्यूज
निळवंडे (अहमदनगर) – निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागला. मात्र आता त्यांची पाण्याची प्रतीक्षा संपली आहे. डाव्या कालव्याप्रमाणे उजव्या कालव्याला देखील पाणी मिळाल्याने दोन्ही कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तर अनेकांच्या त्यागातून निळवंडे धरण आणि कालवा प्रकल्पपूर्ती झाल्याचे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी सांगितले.

मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते सोमवारी ऊर्ध्व प्रवरा निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी झाली. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, निळवंडे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, प्रदीप हापसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री विखे पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या पुढाकाराने वरच्या भागातील कालव्यांच्या कामांना सुरूवात झाल्यामुळेच पाणी शेवटच्या गावाला मिळण्यात यश आले. लाभक्षेत्रातील तालुक्यांची समृद्धता या प्रकल्पामुळेच होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण झाले तो दिवस आपल्या सर्वांसाठी ऐतिहासिक असा होता. आज देखील प्रधानमंत्र्यांच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेदिवशी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा झालेला निर्णय लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा आहे.
डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यानंतर तालुक्यातील काही गावात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या या नुकसान भरपाईचा प्रस्ताव महामंडळाच्या नियामक मंडळाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला असून या नुकसानीची मदत लवकर मिळावी याकरीता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून विनंती करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दळवळण सुलभ व्हावे यासाठी १२३ लोखंडी पुलाची मागणी असून या प्रस्तावास तातडीने मान्यता देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्यावेळी दिलेल्या शब्दाची पूर्ती आज या निमित्ताने करण्यात येत आहे. ८४ किलोमीटर असलेल्या या उजव्या कालव्याचा अकोले, संगमनेर व राहुरी तालुक्यातील ६९ गावांना याचा लाभ होणार आहे. उजव्या कालव्यातून दीड टीमसी पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे सांगत यामुळे लाभक्षेत्रातील कोरडे पडलेले पाझर तलाव, विहिरी, ओढे व जलस्रोतांना एक नवसंजीवनी मिळेल असे ते म्हणाले.

माजी मंत्री मधुकराव पिचड यांनी धरण आणि कालव्यांच्या कामाच्या वाटचालीचा आढावा घेत अनेकांच्या त्यागाने प्रकल्प उभा राहीला असल्याचे सांगितले. याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, माजी आमदार वैभव पिचड यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियंता कैलास ठाकरे यांनी केले. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

