महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – प्रत्येकाला समान संधी, मतदानाचा अधिकार आणि समानता देणारी अशी भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्य घटना असून या राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांना धक्का लागू नये, यासाठी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या सर्व महापुरुषांच्या स्मरण करतानाच राज्यघटनेची तत्त्व जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी सर्वांनी कटिबद्ध असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अमृत उद्योग समूहाच्या सामूहिक ध्वजवंदन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात थोरात बोलत होते. विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठे योगदान दिले. १९४२ ची चळवळ ही ऐतिहासिक चळवळ होती. या चळवळीमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला होता. वयाच्या १८ व्यावर्षी त्यांना कारावास झाला. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर देशातील प्रत्येक नागरिकाला समानता देणारी राज्यघटना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिली. ही राज्यघटना जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना आहे.
आपल्या देशाने गत पंच्याहत्तर वर्षाच्या कार्यकाळात मोठी प्रगती केली. देशावर अनेक संकटेदेखील आली. अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. त्यानंतर देश त्यात स्वयंपूर्ण झाला. देशाने चीन, पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धामध्ये यश मिळविले. राज्यघटनेच्या मार्गदर्शनातून देशाने प्रगती साधली.
महाराष्ट्राने देखील दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांची आदर्श परंपरा कायम राखत अत्यंत यशस्वीपणे वाटचाल केली आहे. शेतीतील प्रगती सोबतच राज्यात कारखानदारी आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार वाढले. त्यामुळे सामान्य माणसाचे जीवनमान देखील समृद्ध झाले आहे.
अत्यंत दुष्काळी आणि प्रतिकूल असलेल्या संगमनेर तालुक्यात १९६८ मध्ये सहकारी साखर कारखाना स्थापन झाला. या कारखान्याच्या माध्यमातून येथील जनजीवन बदलास सुरुवात झाली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अनेक संस्था तालुक्यात उभ्या राहिल्या. आज या संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करताना दिसतात. येथील सहकाराचा पॅटर्न पाहण्यासाठी देशभरातून मान्यवर येत असतात.
आपल्या कार्यकाळात देखील आपण निळवंडे धरण पूर्णत्वास नेले. कालव्यांचा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे निळवंडे धरणाचे पाणी आता लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतात आले आहे. गेल्या काही वर्षातील हा सर्वात मोठा अमुलाग्र बदल ठरला आहे. लाभक्षेत्रात समृद्धी निर्माण होण्यात या धरणातील पाण्याचा मोठा वाटा असेल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत देखील मोठा बदल होणार आहे. एकीकडे ही प्रगती सुरू असली तरी दुसरीकडे या प्रगतीत अडथळे आणण्याचे काम देखील काही लोक करत आहे. त्यावर मात करून आपल्याला विकासाची घोडदौंड कायम राखावी लागेल, असे देखील थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिस्तबद्ध परेडमधून मानवंदना…
कारखाना कार्यस्थळावर सुरक्षा विभाग, अमृतवाहिनी कॉलेज, मॉडेल स्कूल, इंटरनॅशनल स्कूल, विद्याभवन या विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने परेड करून आमदार थोरात यांना मानवंदना दिली. थोरात यांनी यावेळी परेडची पाहणीदेखील केली. याशिवाय उद्योग समूहातील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, दूध संघ, अमृतवाहिनी बँक, डेंटल कॉलेज, सह्याद्री कॉलेज या ठिकाणीही ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


