महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’ या काव्य पंक्तींपासून सुरू होणारे पैशाचे महत्व प्राथमिक शिक्षणातूनही अधोरेखित होते. हातात आलेला पैसा कसा वाचवायचा, त्याची बचत गुंतवणुकीत कशी परावर्तित करायची आणि त्यातून संपत्ती कशी निर्माण करायची याचे ज्ञान म्हणजेच आर्थिक साक्षरता होय. ही आर्थिक साक्षरता प्राथमिक शिक्षणातूनच शिकवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक आणि आर्थिक गुंतवणूक तज्ञ सुनील कडलग यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील जिल्हा परिषदेच्या रामवाडी शाळेत प्रजासत्ताक दिनी कडलग यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी ‘चला अर्थसाक्षर होऊयात’ हा उपक्रम उपक्रमशील शिक्षक केशव घुगे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थी व पालकांना संबोधित करताना कडलग बोलत होते.
अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक नारायण खरात होते. व्यासपीठावर व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविना खरात, उपाध्यक्ष संतोष खरात, संदिप खरात, भास्कर गोसावी, संजय खरात, प्रकाश खरात, आनंदा खरात, सोमनाथ खरात, संतु खरात, योगिता खरात, एकनाथ गोसावी, मच्छिंद्र गोसावी, दिलीप खरात आदी उपस्थित होते.
कडलग म्हणाले, पैशांविषयी नेहमी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सकारात्मक भावना शिक्षक व पालकांनी रुजविण्याची आवश्यकता आहे. ‘पैसा पैसा काय करतो ? पैशाला कोंबड्या खात नाहीत’, ‘पैसा काय झाडाला टांगला आहे काय’? अशा वाक्यांचे प्रयोग पालकांकडून मुलांशी बोलताना नेहमी होत असतात ही वाक्ये मुलांच्या मनात पैशांविषयी नकारात्मक भावना निर्माण करतात. ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान’, अंथरूण पाहून पाय पसरावे अशा अल्पसंतृष्ट विचारांचे संस्कार पालकांनी मुलांवर करू नयेत.

पैसा वाचविता येतो, त्याच्या बचतीतून व बचत गुंतवणुकीत परावर्तित करण्यातून संपत्ती निर्माण करता येते, याचे अनुभवातून शिक्षण विद्यार्थ्यांना देणे अपेक्षित आहे. शासनाच्या शिक्षण विभागाने त्यासाठी सकारात्मक उपक्रम सुरू करण्याचे धोरण राबविले आहे. म्हणूनच प्राथमिक शाळांमधून ‘सोनू-मोनू बचत बँक, आठवडे बाजार’ असे उपक्रम राबवून मुलांना व्यवहार ज्ञान यावे, यासाठी प्रयत्न सुरू केले. ही स्तुत्य बाब आहे. मुलांच्या वयाच्या तीन वर्षापर्यंतच त्यांच्या मेंदूचा विकास ८० टक्के होत असतो, म्हणून पालकांनी त्यांना लहान वयातच अर्थ साक्षरतेचे धडे देणे आवश्यक आहे. दुर्दैवाने तसे होताना मात्र दिसत नाही.म्हणून प्राथमिक शिक्षणातच अर्थसाक्षरतेचा समावेश झाल्यास समृद्ध भारताचे सक्षम नागरिक म्हणून विद्यार्थी तयार होऊ शकतील.
जागतिक गुंतवणूक गुरु व जगातील बिलेनियर व्यक्तिमत्व वॉरेन बफेट यांनीही प्राथमिक शिक्षणातील अर्थ साक्षरतेचे महत्व अधोरेखित केले. लहान मुलांना अर्थ साक्षरतेचे शिक्षण देण्यासाठी त्यांनी सिक्रेट मिलेनियर क्लब नावाची ॲनिमेटेड वेब सिरीज सुरू केली होती, असे उपक्रम अर्थ साक्षरतेसाठी काम करणाऱ्या संस्था व शासन यांच्या समन्वयातून राबवण्यात आले पाहिजेत. अर्थ साक्षरतेविषयी जागृती निर्माण करण्यासाठी विविध तज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजनही शाळा शाळांमधून करण्यात आल्यास ही चळवळ पुढे जाईल, असे ते म्हणाले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमधून मिळवलेल्या यशाबद्दल त्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले. सागर खरात यांच्या सौजन्याने आदर्श विद्यार्थी म्हणून कृष्णा खरात या विद्यार्थ्याला सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव घुगे यांनी तर आभार प्रदर्शन सुरेखा आंधळे यांनी केले.


