श्रीमंत आणि योगी हे शब्दकोषातील दोन स्वतंत्र शब्द. बर्याचअंशी विरुध्द अर्थी. जो श्रीमंत, ऐहिक सुखाचा मालक. तरी तो एखाद्या योग्याप्रमाणे दैदिप्यमान, ज्याचा निर्धार अखंड, ज्याचा निश्चय मेरू पर्वताएवढा विराट.. असे एकच राजे होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज. रामदेव राय यादवांपासून शककर्त्या सम्राटांनी या भूमीवर राज्य केलं. त्यात शक आहेत, चालुक्य आहेत, हूण आणि चौलही आहेत. ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता असं म्हणतात त्या नेपोलियन बोनापार्ट, तैमूरलंग, चेंगीझखान, अलेक्झांडर अशा सम्राटांची साम्राज्यंही लयाला गेली. या सम्राटांची महान योध्दे म्हणून जगाने प्रशंसा केली. पण छत्रपतींसारखं महान त्यांना होता आलं नाही. हिंदवी स्वराज्याच्या अशा महान योध्दयाच्या पासंगाला तरी कोणी उतरू शकेल काय? दुर्देवाने होय, उतरवलं जातंय. छत्रपतींच्या नखाची सर नसलेल्या नरेंद्र मोदींची श्रीमंतयोगी छत्रपतींशी बरोबरी करण्याचे उद्योग सध्या सुरू आहेत.
अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या प्रमुखाने राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्यात हे उद्योग केले आहेत. देशाच्या पंतप्रधानांपुढे काही लोक किती लाचार आहेत, याचं हे डोळे देखले उदाहरण होय. नरेंद्र मोदी यांना कधी विष्णूचा अवतार ठरवलं जातं तर ब्रम्हांडांचा करता करविता म्हणून संबोधलं जातं. अयोध्येतल्या राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यात त्या न्यासाच्या प्रमुखाने म्हणजे गोविंदगिरी नावाच्या साधूने पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी वापलेली विशेषणं त्यांच्या तोंडी सहज म्हणून आलेली नाहीत.

यामागे छत्रपतींना कमी लेखण्याचाच प्रयत्न होता हे लक्षात घेतलं पाहिजे. योगीराज ही उपाधी नरेंद्र मोदींना देत गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवरायांचाच अवमान केला असं नाही तमाम देशाचा, त्याचबरोबर छत्रपतींना आराद्य मानणार्या महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींचा अनादर केला आहे. महाराष्ट्रातल्या भंपक आणि लाचार अंधभक्तांना त्याचं काही वाटणार नाही. अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन झालं ही सार्या देशवासीयांसाठी आनंदाची आणि स्वाभीमानाची बाब. पाचशे वर्षांची रामप्रेमींची उपासना फळा आल्याचा आनंद देशवासीयांच्या चेहर्यावर होता. यानिमित्त त्यांनी दुसरी दिवाळी साजरी केली. पण याच भावनेचा जेव्हा खेळ केला जातो, या भावनेवर स्वार होऊन स्वत:ची पोळी भाजली जाते तेव्हा त्याचा समाचार घेणं गरजेचं असतं. गोध्रात भक्तांना जिवानिशी मारणारे, पुलवामात सैनिकांना देशोधडीला लावणारे हे लोक रामालाही सोडत नाहीत, अशी सहज प्रतिक्रिया उमटते. देशातील चार धर्मगुरुंनी या सोहळ्यावर ज्या कारणांसाठी बहिष्कार टाकला त्या कारणांची अशावेळी कोणालाच चिकित्सा नको असते. हिंदू धर्म हा आपल्या सोयीने वापरायची गोष्ट नाही, हे धर्मगुरूंनी स्पष्ट करूनही सत्ताधार्यांनी धर्माचा वापर पध्दतशीरपणे पक्षीय राजकारणासाठी करून घेतला. याकडे दुर्लक्ष करता करता जेव्हा छत्रपती शिवरायांचा उल्लेख कार्यक्रमात झाला तेव्हा ऊर भरून येत होता. माझ्या महाराष्ट्राच्या श्रीमंतयोग्याचं कौतुक सातासमुद्रापलिकडे जाण्याचा आनंद यात होता. पण जेव्हा शिवरायांच्या उपाधित नरेंद्र मोदींना बसवलं जात होतं तेव्हा पायाखालची वाळूच सरून गेली. लाचार बनलेले साधू सत्ताधार्यांपुढे किती हतबल आहेत, याची प्रचिती आली.
मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची अदिलशाही आणि युरोपीयन वसाहतवादी शक्तींशी युक्ती आणि बुध्दीच्या वापराने, शिस्तबध्द लष्कराच्या बळावर आणि सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्या छत्रपतींच्या ऐतिहासिक कामगिरीचा स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक राष्ट्रीय नेत्यांने कथा रुपाने वापर करत देशवासीयांना ब्रिटिशांविरोधी एका छत्राखाली आणून त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम केलं. ते छत्रपती शिवराय हे तमाम देशवासीयांचे आजकाल झालेले दैवत नाहीत, याची जाणीव भंपकांना असण्याचं कारण नाही. असा अद्वितीय राजा माझ्या महाराष्ट्रात जन्मला हे आम्हा तमाम मराठी माणसाचं वैभव. अशा या दैवताच्या पायाच्या नखाची सर नसलेल्या व्यक्तीला छत्रपतींची उपाधी देण्याचे उद्योग करून गोविंदगिरी नावाच्या माणसाने तमाम देशाचा अवमान केला आहे.
छत्रपतींविषयी अशी काहीबाही टिपण्णी केली की आपण मोठे होत असतो, असा भाजप समर्थक भक्त आणि त्या पक्षाची पाचवी गाणार्यांचा समज आहे. याआधी भाजपच्या नेत्यांनीही तो समज खरा असल्याचं दाखवून दिलं होतं. दुर्देवाने त्या पक्षाने या मंडळींचं काहीही वाकडं केलं नाही. उलट त्यांचं पुनर्वसनच केलं. गोविंदगिरी तर पक्षाबाहेरील असल्याने त्यांचं काय करणार असा सवाल भाजपची मंडळी करू शकतील. ज्या छत्रपतींनी ज्या महाराष्ट्राला जगख्याती मिळवून दिली त्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला याची थोडी तरी चाढ आहे की नाही, हा प्रश्न आहे. कोणीही यावं आणि शिवरायांविषयी काहीही बडबडावं आणि आम्ही अंधळ्या बहिर्याचं सोंग घेऊन गप्प बसावं इतके महाराज कमजोर होते? छत्रपतींवर अश्लाघ्य टिपण्णी करणार्या जेम्सलेन नामक लेखकाला नको ती माहिती पुरवणार्या पुण्याच्या भांडारकर प्राच्य संस्थेला धडा शिकवणारे आज आहेत कुठे?

शिवरायांची अवहेलना भाजपच्या मंडळींनी एकदा नव्हे अनेकदा केली. कोणीतरी प्रशांत परिचारक उठतो आणि छत्रपतींच्या नावाने कलह करतो. छिंदम नावाचा बाष्कळ शिवरायांच्या नावाने शिव्या हासडतो तरी त्यांचं काहीच बिघडत नाही. कोश्यारी नावाचा माणूस राज्यपाल म्हणून येतो आणि तो महाराजांवर काहीही टिपण्णी करतो, याचा राज्यभर निषेध होतो. पण भाजपच्या एकाही नेत्याला त्यावर बोलावंसं वाटत नाही, इतकी सत्ता लाचारी या मंडळींमध्ये भरलेली देशाने याची डोळा पाहिली. कोणीतरी शुधांशू त्रिवेदी नावाचा पक्ष प्रवक्ता उठतो आणि शिवरायांच्या नावाने माफीनामे दिल्याचं ठोकून देतो. तरीही आम्ही बांडगुळांसारखे त्याचा साधा प्रतिवाद करू शकत नाही. याचा अंदाज भाजपच्या मंडळींनी घेतला आणि भोंदूं साधूंकरवी महाराजांच्या नावाने काहीही खपवण्याचा उद्योग सुरू केला. नाव घ्यायचं छत्रपतींचं आणि प्रत्यक्ष कृती त्यांच्या बदनामीची करायची हा या मंडळींचा छंद बनला आहे. छत्रपती शिवरायांविषयी मनात खरोखरच प्रेम असतं तर शिवरायांविषयी अनादराने बोलणार्यांच्या मुसक्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवळल्या असत्या. मात्र भक्त असे अनादराने बोलत असतानाही मोदी मौनी बनले.


