महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – राज्य शासनाने १८ डिसेंबरला पारित केलेल्या खासगी विद्यापीठा संदर्भातील विधेयकामुळे गरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची दारे बंद होणार असल्याने संगमनेरमधील सह्याद्री महाविद्यालयासमोर सोमवारी छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्यावतीने खासगी विद्यापीठ विधेयकाची होळी करण्यात आली.
सरकारने पारित केलेल्या या विधेयकामुळे या नव्या विद्यापीठाच्या महाविद्यालयात शिकणारे कोणतेही गरीब विद्यार्थी या पुढे फ्रिशिप किंवा स्कॉलरशिपसारख्या सवलतीपासून वंचित राहणार आहे. ज्यांच्याकडे पैसा त्यानाच शिक्षणाची संधी भेटेल. ज्यांच्याकडे पैसा नाही त्या विद्यार्थ्यांना कितीही गुणवत्ता असली तरी त्यांना खाजगी विद्यापीठात प्रवेश मिळणार नाही. यामुळे गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडणार आहे. त्यांच्या शिक्षणावर गदा येणार आहे.

या अधिनियमान्वये स्थापन केलेले प्रत्येक विद्यापीठ हे स्वयं अर्थ सहाय्यीत असेल. विद्यापीठ शासनाकडून कोणत्याही स्वरूपाचे इतर वित्तीय साहाय्य मिळण्यास हक्कदार असणार नाही. विद्यापीठात प्रवेश घेतलेला कोणत्याही प्रकारच्या वित्तीय सहाय्यासाठी, शिष्यवृत्तीसाठी किंवा शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी राज्य शासनाकडे मागणी करण्यास हक्कदार राहणार नाही. हे खाजगी विद्यापीठ विधेयक रद्द करावे या मागणीसाठी छात्रभारतीच्यावतीने सह्याद्री कॉलेजच्यासमोर विधेयकाची होळी करण्यात आली.
यावेळी छात्रभारतीचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, राज्य सहसंघटक गणेश जोंधळे, जिल्हा अध्यक्ष राहुल जऱ्हाड, ज्ञानेश्वरी सातपुते, आचल खतोडे, पूर्वा शिरसाठ, समृद्धी वाकचौरे, यादव संचेत, रुषाली भागवत, ओम काकड, सोहम घुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

