महाराष्ट्र संवाद न्यूज
राहुरी कृषी विद्यापीठ – २०४७ चा विकसित भारत घडविण्याचे स्वप्न कृषी विद्यापीठांच्या प्रयत्नातून या विद्यापीठांमधून पदवी घेतलेले कृषी पदवीधर आपल्या ज्ञान व कौशल्याने साकारतील, असा विश्वास राज्याचे राज्यपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी व्यक्त केला.
राहुरी कृषी विद्यापीठाच्या ३७ व्या पदवी प्रदान समारंभात स्नातकांसह जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र बारवाले आणि विलास शिंदे यांना कृषी विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यपाल दूरदृश्य प्रणाली द्वारे बोलत होते.
यावेळी मंत्री विखे यांच्यासह ट्रस्ट फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सेसचे (टास) अध्यक्ष, भारत सरकारच्या कृषि संशोधन व शिक्षण विभागाचे माजी सचिव तथा नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक पद्मभूषण डॉ. आर. एस. परोदा, कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, महिको कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, परभणी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, दापोली येथील डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. प्रदिप इंगोले, अधिष्ठाता (कृषि) डॉ. श्रीमंत रणपिसे, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक सदाशीव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलिप पवार आणि विद्या शाखेचे उपकुलसचिव श्रीमती स्वाती निकम उपस्थित होते.

राज्यपाल बैस म्हणाले, कृषी हा देशाचा मुख्य आधार असून ५८% पेक्षा अधिक लोक कृषी क्षेत्राशी निगडित आहेत. कृषी क्षेत्राच्या भविष्याला आकार देण्यासाठी कृषी विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे. विद्यापीठातून पदवी घेणारे केवळ पदवीधर विद्यार्थी नसून नवपरिवर्तनाचे अग्रदूत आहेत. देशाची कृषी परंपरा समर्पक भावनेने जपण्याची संधी या पदवीधरांना मिळाली आहे. ज्या शेतकऱ्यांचे जीवन पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध बनविण्यासाठी पदवीधरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा.
कृषि मंत्री धनंजय मुंडे यांचा संदेश कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी वाचून दाखवला. संदेशात कृषि मंत्री म्हणाले, कृषि क्षेत्रात डिजीटल तंत्रज्ञानामुळे अधिक प्रगती होत आहे. यामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा मोलाचा वाटा आहे. सध्या कृषि क्षेत्र हे बदलत्या हवामानाला सामोरे जात आहे. या बदलत्या हवामानाला सामोरे जातांना शाश्वत शेतीसाठी सरकार प्रयत्नशील आहे.
डॉ. आर. एस. परोदा म्हणाले, सन २०३० सालापर्यंत आपल्या देशात एकही गरीब नसणे व कोणीही उपाशी राहणार नाही हे सगळ्यात मोठे आव्हान असणार आहे. त्याचबरोबर वातावरणातील बदलाला सामोरे जाणे, पाणी व जमीन या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास थांबविणे, सामाजिक व आर्थिक विषमता दुर करणे ही आपल्या समोरील मोठी आव्हाने आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी पायाभुत सुविधांचा विकास, नविन तंत्रज्ञान, पारदर्शक योजना व संस्थापक यंत्रणा या चार मुद्द्यांवर काम करावे लागणार आहे.
कुलगुरु डॉ. पाटील यांनी मानपत्रांचे वाचन केले. ७३ विद्यार्थ्यांना पीएचडी, ३०० विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व ६५२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. पदवीदान समारंभात सन २०२२-२३ मध्ये बीएस्ससी (कृषि) पदवीत प्रथम आलेली पुजा नवले, बीएस्ससी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली ऐश्वर्या कदम, कृषि अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेली गौरी चव्हाण यांना सुवर्णपदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी कुलगुरु डॉ. योगेंद्र नेरकर, डॉ. सुभाष पुरी, डॉ. राजाराम देशमुख, डॉ. तुकाराम मोरे, डॉ. के. पी. विश्वनाथा, डॉ. एम. सी. वार्ष्णेय, डॉ. शंकरराव मगर, डॉ. अशोक ढवण, डॉ. किसनराव लवांडे, डॉ. संजय सावंत, डॉ. विलास भाले, चंद्रशेखर कदम, माजी संचालक डॉ. किरण कोकाटे, डॉ. हरी मोरे उपस्थित होते.

