महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – खंडणीसाठी राहुरीतील वकील दांपत्याचे अपहरण करून निघून खून केल्याप्रकरणी संगमनेर मधील वकिलांनी या घटनेचा कामकाज बंद ठेवत तसेच प्रांताधिकार्यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे. वकील संरक्षण कायदा तातडीने संमत करण्याची मागणी दिलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
राहुरी शहरातून बेपत्ता झालेल्या जयवंत राजाराम आढाव (वय ५२ वर्ष) व मनीषा राजाराम आढाव (वय ४२ वर्ष, दोघे रा. मानोरी, ता. राहुरी जि. अहमदनगर) या वकील दांपत्याचा पाच लाखाच्या खंडणीसाठी खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या संदर्भात वकिलाच्याच पक्षकारासह चौघांना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून एक आरोपी अद्यापही फरार आहे.
वकील दांपत्याच्या खुनाच्या आरोपावरून पोलिसांनी मुख्य सूत्रधार किरण उर्फ दत्तात्रेय नानाभाऊ दुशिंग (३२, उंबरी, ता. राहुरी) व त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे (येवले आखाडा, राहुरी), शुभम संजीत महाडिक (मानोरी, राहुरी) व हर्षल दत्तात्रय ढोकणे (उंबरी, राहुरी) या चौघांना अटक केली असून आणखी एक साथीदार बबन सुनील मोरे (उंबरी, राहुरी) हा फरार आहे.
वकील दांपत्याचा खून त्यांच्या पक्षकारानेच केल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर संगमनेरमधील वकिलांनी एकत्र येत या घटनेचा निषेध नोंदविला. तसेच न्यायालयीन कामकाजासह प्रांताधिकारी व तहसीलदारासमोरील कामकाजामध्ये सहभाग घेतला नाही. वकिली व्यवसाय करीत असताना समाजाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने वकील त्यांचे काम प्रामाणिकपणे पार पडत असतात.
सामाजिक उत्तरदायित्व निभावत असताना पक्षधारासाठी ते लढत असतात. त्यात वकिलांचा व्यक्तिगत हितसंबंध नसतो. असे काम करत असताना अशा प्रकारच्या घटना घडणे अतिशय घातक असून सदरची घटना अतिशय दुर्दैवी, घृणास्पद व निंदनीय असल्याचे वकील संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
वकील संघाचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील यांच्यासह ॲड. गोरक्ष कापकर, ॲड. अतुल पवार, ॲड. अमोल घुले, ॲड. माया पवार, ॲड. स्वाती गडाख, ॲड. तात्यासाहेब गुंजाळ, ॲड. प्रदीप मालपाणी, ॲड. योगेश गुंजाळ, ॲड. त्रिंबक गडाख, ॲड. डी. एस. वर्पे, ॲड. अरुण आहेर, ॲड. पंकज कडलग, ॲड. विवेक बोऱ्हाडे, ॲड. गिरीश मेंद्रे, ॲड. शरीफ पठाण आदींसह वकील उपस्थित होते.

ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करा…
राज्यात वकिलांवर होणारे वाढते हल्ले हे चिंताजनक बाप बनले आहे. संगमनेरमध्ये देखील गेल्या वर्षभरात अशा प्रकारचे ॲड. प्रसाद कडलग, ॲड. शरीफ पठाण यांच्यावर हल्ले झाले. आता राहुरीत वकील दाम्पत्याचे अपहरण करून त्यांचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे तातडीने ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्याची मागणी होत आहे.

