महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते गंगामाई घाटाकडे जाणारा म्हाळूंगी नदीवरील पूल तुटून दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. नव्याने या पुलाची उभारणी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून तिरंगा होत असल्याचा कारणावरून शुक्रवारपासून (ता. २ फेब्रुवारी) स्वामी समर्थ मंदिरापाशी नागरिक साखळी उपोषणास प्रारंभ करणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला या पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
तत्कालीन एका कामाच्या चुकीमुळे म्हाळूंगी नदीवरील पूल कोसळला होता. संगमनेर शहरातील अनेक विभागांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने या पुलाची बांधणी तातडीने करण्यात यावी अशी मागणी होती. पूल कोसळल्याने अनेकांची मोठी गैरसोय निर्माण झाली. मात्र पालिकेमध्ये प्रशासकीय राज सुरू असल्याने या पुलाच्या कामास वेळ काढूपणा केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले होते.
पुलाच्या कामासाठी लागणारा मोठा निधी लक्षात घेता बराच काळ रखडलेल्या या पुलाच्या निर्मितीसाठी निधीवरून तालुक्याचे आमदार बाळासाहेब थोरात आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात रंगलेली जुगलबंदी देखील संगमनेरकरांनी अनुभवली. पुलाच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या एका कॉम्प्लेक्सच्या कामाचा निधी वळविण्यात आला. हा निधी वळविण्यात आल्यानंतर मंत्री विखे समर्थकांनी पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याच्या गप्पा देखील मारल्या. मात्र तरी देखील पुलाच्या कामाला अद्यापही सुरुवात झाल्याचे दिसत नाही.

नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्या नंतर वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर जाग्या झालेल्या पालिका प्रशासनाने या कामासाठीच्या आवश्यक मंजुऱ्या मिळवत या कामाची निविदा देखील काढली. कामाचा कार्यारंभ आदेशही देण्यात आला मात्र कोठे माशी जिंकली कोण जाणे? पुलाच्या बांधणीसाठी जुन्या सध्याच्या पुलावर असलेल्या जलवाहिन्या स्थलांतरित करणे आवश्यक आहे,
मात्र या कामाला अद्यापही सुरुवात होत नसल्याने यात प्रशासनाची दिरंगाई दिसून येत आहे, असा आरोप करत म्हाळूंगी पूल बनाव कृती समितीच्यावतीने सकाळी ११ वाजल्यापासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती अमोल डुकरे, अमित देव्हारे, अनुप म्हाळस, किरण पाटणकर व संकेत पाटणकर यांनी दिली.

