महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने दुष्काळी परिस्थिती असतानाही सन २०२४-२४ या हंगामात सहा लाख मेट्रिक टन उस गाळपाचा टप्पा पार केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली.
चालू हंगाम हा अत्यंत अडचणीचा व दुष्काळजन्य परिस्थितीचा आहे. कारखान्यावर सभासद, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक यांचा मोठा विश्वास आहे. दुष्काळी परिस्थिती असतानाही चालू हंगामात ६ लाख मेट्रिक टनाचे गाळप करण्याचा टप्पा कारखान्याने पार केला.

हे वर्ष थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्ताने कारखाना प्रशासकीय नवीन इमारतीमध्ये त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारला याचबरोबर या निमित्ताने विविध उपक्रम राबवले आहे.
आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने कायम कार्यक्षमता व अचूकता राखून सभासद शेतकरी ऊस उत्पादक व कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले. या चांगल्या कामाबद्दल कारखान्याचा राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मान झाला आहे.
५५०० मेट्रिक टन क्षमता असलेल्या या कारखान्याने एका दिवसात विक्रमी ९१२० मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. म्हणजे कार्यक्षमतेच्या १६५% विक्रमी सरासरीने उत्पादन झाले आहे. यापूर्वीही ५ फेब्रुवारी २०२१ रोजी ९०२० मे. टन तर १४ डिसेंबर २०२२ रोजी ९०१० मे.टन आणि ३१ जानेवारी रोजी ९१२० इतके विक्रमी उत्पादन झाले आहे.

