महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – निळवंडे धरणासह डाव्या आणि उजव्या कालव्याची कामे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमधूनच पूर्ण झाली आहेत. निळवंडे धरणाच्या माध्यमातून डाव्या व उजव्या कालव्यातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविणारे थोरातच खरे ‘जलनायक’ असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
तालुक्यातील निमगाव खुर्द येथे उजव्या कालव्यातून आलेल्या पाण्याचे पूजन ढोल ताशाच्या गजरामध्ये गुलालाची उधळण करत माजी आमदार डॉ. तांबे, एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तांबे बोलत होते.
तांबे म्हणाले, आमदार थोरात यांनी १९९९ मध्ये प्रथमताच राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबरोबर निळवंडे धरणाच्या कामाला चालना दिली. त्यानंतर त्यांनी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना धरणाचे पाणी मिळावे यासाठी धरणाच्या निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. धरणाच्या आणि कालव्यांच्या कामासाठी सातत्याने निधी मिळविला.
त्यांच्या पाठपुराव्यातूनच धरण आणि कालव्यांची कामे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच पूर्णत्वास गेली. धरणातून केवळ पाणी सोडण्याची औपचारिकताच बाकी होती. मात्र सरकारने दिरंगाई केली. त्यामुळे या धरणाच्या निर्मितीमध्ये थोरात यांचा सर्वाधिक वाटा असून तेच खऱ्या अर्थाने जलनायक आहे. धरणाची स्वप्नपूर्ती झाल्याने धरणातून आता डाव्या उजव्या कालव्याद्वारे लाभक्षेत्रात पाणी आले आहे. दुष्काळी भागात पाणी आल्याने जनता आनंदित झाली.
जयश्री थोरात म्हणाल्या, आमदार थोरात यांनी धरण व कालव्याची कामे केली. डाव्या कालव्यापाठोपाठ आता उजव्या कालव्यात हे पाणी आल्याने त्यांचे दुष्काळी भागात पाणी पोहोचविण्याचे स्वप्न साकार झाले आहे. “दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात निळवंडेचे पाणी जाईल तो दिवस माझ्या जीवनातील आनंदाचा सर्वोच्च दिवस असेल”, असे थोरात यांनी म्हटले होते. आज खऱ्या अर्थाने त्यांचे स्वप्न पूर्णत्वास गेले.
यावेळी माधवराव कानवडे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे यांचीही भाषणे झाली. कालव्यातील पाण्याचे पूजन करताना इंद्रजीत थोरात, संपत डोंगरे, रमेश गुंजाळ, विलास कवडे, भास्करराव गोपाळे, मनीष गोपाळे, नानासाहेब कानवडे, दत्तू कोकणे, सरपंच संदीप गोपाळे, मीनानाथ शेळके, बाजीराव कवडे, बाळासाहेब गोपाळे, एकनाथ गोपाळे, प्रभाकर गोपाळे, किरण कानवडे, शिरीष गोपाळे, राजेश गोपाळे, नवनाथ कातोरे, लता खताळ, सोमनाथ कानवडे, राहुल चंद्रमोरे, अरुण गुंजाळ, बाळासाहेब कानवडे, उन्नती महिला ग्राम संघाच्या महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच संदीप गोपाळे यांनी केले. सूत्रसंचालन बाळकृष्ण गांडाळ यांनी केले तर मनीष गोपाळे यांनी आभार मानले

ढोल ताशांच्या आणि पारंपारिक वाद्याच्या गजरात पाण्याचे जल्लोषमय वातावरणात पूजन…
निळवंडेच्या उजव्या कालव्यातून संगमनेर तालुक्याच्या हद्दीत पाणी आल्यानंतर निमगाव खुर्दसह विविध गावातील महिलांनी या पाण्याचे पूजन केले. यावेळी ढोल ताशांचा व पारंपारिक वाद्यांचा गजर व आनंदोत्सवात सर्वांनी मोठा जल्लोष करत पेढे वाटून आपला आनंद साजरा केला.

