थोरातांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदोत्सवात उजव्या कालव्याचे जलपूजन
महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – निळवंडे धरणाचे डाव्या आणि उजव्या कालव्यातून येणारे पाणी पुढील अनेक पिढ्या समृद्ध करणारे ठरणार आहे. धरण आणि कालव्याच्या कामासाठी आपल्या कार्यकाळात सातत्याने पाठपुरावा करत सरकारकडून निधी मिळविला. अनेक अडचणींवर मात करून हे धरण पूर्णत्वास गेले. आता धरणातून पाणी आपल्यापर्यंत पोहोचले असल्याने या कामाचा मोठा आनंद आणि समाधान असल्याचे प्रतिपादन निळवंडे धरण आणि कालव्याचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
हिवरगाव पावसा येथे उजव्या कालव्याचे जलपूजन आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माधवराव कानवडे, आर. बी. राहणे, उत्तमराव घोरपडे, गणपतराव सांगळे, रामदास वाघ, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, डॉ. प्रमोद पावसे, तानाजी आहेर, नानासाहेब खर्डे, विजय राहणे, कैलास पानसरे, सुभाष गुंजाळ, रमेश गुंजाळ आदींसह पंचक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी चिंचोली गुरव येथे घेतलेल्या पाणी परिषदेतून निळवंडे येथे धरणाचा निर्णय झाला. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. १९९९ मध्ये पाटबंधारे राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने या कामाला गती मिळाली. अनेक अडचणीतून सातत्याने या कामासाठी निधी उपलब्ध केला. धरणाबरोबर डाव्या आणि उजव्या कालव्याचे काम आपणच मार्गी लावले.
महाविकास आघाडी सरकार असते तर ऑक्टोबर २२ मध्ये डाव्या कालव्यातून आणि मे २३ मध्ये उजव्या कालव्यातून पाणी आले असते. मात्र सरकार बदलले आणि कामे थांबवली गेली. तरीही आपणच पाठपुरावा केला. आज केलेल्या कामाचे समाधान होत आहे. पुनर्वसित शेतकरी, अधिकारी, कर्मचारी अनेकांनी खूप मदत केली.
परंतु ज्यांनी विरोध केला ते आता पाणी सोडले असे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. काम कोणी केले ते जनतेला माहिती आहे. मात्र स्थानिक काही खबरे निरोप देतात आणि चांगल्या कामात खोडा घातला जातो. नियतीने आपल्या हातून निळवंडे धरण करून घेतले आहे. या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. सर्वांना पाणी मिळेल. या करता मनोहरपुरा पॅटर्न सारखा नवीन संगमनेर पॅटर्न आपल्याला राबवायचा आहे. पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आल्याने सर्वसामान्य माणूस सुखावला हीच खरी मोठी आनंदाची देण आहे.

तांबे म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी निळवंडे धरणासाठी जागा निवडली. त्यामुळे वरच्या भागातून कालवे आले. जास्तीत जास्त भागाला पाणी देण्यासाठी आमदार थोरात यांनी नियोजन केले आहे. पाणी देणारे कोण आहे आणि या कामाचे श्रेय कोण लाटू पाहते आहे हे जनतेला कळत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, उत्तमराव घोरपडे, नानासाहेब खर्डे, आराध्या गायकवाड, प्रमोद पावसे आदींनी मनोगत व्यक्त केले.
गावोगावी जोरदार जंगी मिरवणुकीने आमदार थोरात यांचे स्वागत…
ये बंदा लय जोरात, बाळासाहेब थोरात या गीतावर गावोगावी मोठ्या जल्लोषात तरुणाईने आमदार थोरात यांचे स्वागत केले. प्रत्येक गावच्या शेकडो सुवासिनीने औक्षण करत पाण्याचे जलपूजन केले. तर ढोल ताशा व पारंपारिक गजरामध्ये झालेले हे अभूतपूर्व सोहळे संस्मरणीय ठरले आहेत.

