प्रवीण पुरो | मो. 8169135253
देशातील लोकसभा निवडणुका जसजशा पुढे येत आहेत तसतसं देशातील राजकारण कोणतंही वळण घेऊ शकतं. विरोधकांच्या इंडिया आघाडीचे प्रवर्तक नितीश कुमारच आघाडी सोडून भाजपला जाऊन मिळत असतील, तर इतर कोणत्याही गोष्टींची चर्चा ही खूजीच. देशाच्या या विचित्र राजकीय परिस्थितीपासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी विरोधी पक्षांनी प्रामाणिक हालचाली सुरू ठेवल्या असल्या आणि या प्रयत्नाला अनेकांनी वरकरणी पाठिंबा तसंच आघाडीत सामील होण्याचा प्रयत्न केला तरी शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल, हे कोणीही सांगू शकत नाही.
महाराष्ट्र हे देशाला वळण देणारं राज्य मानलं जातं. सर्वार्थाने देश आपल्या राज्याकडे आदर्श म्हणून पहात असे. पण गेल्या काही वर्षांपासून विशेषत: राज्यात भाजपप्रणित राज्यसत्ता निर्माण झाल्यापासून महाराष्ट्रावर असलेला आदर्शतेचा शिक्का पुरता पुसून गेला आहे. पूर्वी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला हर एक कारणांसाठी उत्तर प्रदेश आणि बिहारचे दाखले द्यावे लागत होते. पण आता आपल्या राज्याने या दोन्ही राज्यांना केव्हाच मागं टाकलं आहे. विकास हा विषय विचारात घेतला तरी ही दोन्ही राज्य महाराष्ट्राला मागे टाकतात की काय, असा संशय येऊ लागला आहे.
मुंबईतील महत्वाची कार्यालयं ही अहमदाबाद आणि नव्या गिफ्टसिटीत पळवून नेली असताना महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प आणि केंद्रिय कार्यालयंही राज्याबाहेर जात आहेत. तरीही राज्यातील भाजपप्रणित सत्तेने जराही प्रतिकार केल्याचं दिसलं नाही. हा झाला विकासाचा मुद्दा. राजकारणात तर महाराष्ट्राने देशातल्या सर्वच राज्यांना तोंडात बोट घालायला लावलं आहे. देशातील नावाजलेलं नेतृत्व मानलं जाणार्या शरद पवारांचा पक्षच त्यांचा नाही, असं दर्शवणारी राजकीय दरोडेखोरी याच राज्यात घडली. शिवसेना हा पक्ष बाळासाहेबांचा नाहीच मुळी, हे दर्शवणारे निर्णय देत महाराष्ट्राने राजकारणात आपण किती नीच आहोत, हे दाखवून दिलंय. विरोधकांचं राजकीय जीणं पुरतं हैराण करून ठेवणार्या भाजपने राजकारणात महाराष्ट्राच्या नावाला काळिमा फासला आहे.
हे सगळं पाहिल्यानंतर महाराष्ट्राला पुन्हा वळणावर आणण्याची जबाबदारी ही शिल्लक असलेल्या विरोधी नेत्यांना सांभाळावी लागणार आहे. यात अर्थातच उध्दव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्या सारख्यांची जबाबदारी मोठी आहे. या जबाबदारीचं ओझं उचलण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब अर्थात प्रकाश आंबेडकर मागे लागले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीचा घटक असलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत स्थान देण्यात आलं आहे. रामदास आठवले यांच्यावर नाराज असलेला दलित मतदार वंचितच्या रुपाने महाविकास आघाडीला फायदेशीर ठरू शकतो, असा यामागचा हेतू. पण हा हेतू किती सफल होतो हे प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच पाहायला मिळेल.

महाराष्ट्राच्या राजकारणात विश्वासपात्र नसलेल्यांमध्ये ज्या काहींची नावं आवर्जून घेतली जातात त्यात प्रकाश आंबेडकर यांचं नाव आवर्जून येतं. आंबेडकर आणि त्यांचा गट हा भाजपची दुसरी आवृत्ती असल्याचा आरोप त्यांच्यावर सातत्याने होत आला. यापूर्वी पार पडलेल्या राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आंबेडकरांच्या भूमिकांवर कायम संशय व्यक्त झाला. हा संशय राजकीय पक्षांपेक्षा मतदारांकडूनच व्यक्त केल्याचं दिसेल. निवडणुकांमध्ये विरोधकांच्या मतांमध्ये फूट पाडून त्याचा फायदा भाजपला मिळवून देण्याचा आक्षेप तेव्हा राजकीय क्षेत्रातील जो तो घेत होता. दुर्देवाने हा संशय आजही कमी झालेला नाही, हीच खरी गोम महाविकास आघाडीच्या सामर्थ्याची ठरणार आहे.
महाविकास आघाडीत आपल्याला घ्यावं, यासाठी प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या प्रवक्त्यांनी केलेली वक्तव्यं पाहिली की आंबेडकर हे आघाडीच्या कळपात बसून भाजपला आतून हात देणार, असा समज व्यक्त होतो. राज्यात लोकसभेच्या ४८ जागांपैकी आपला पक्ष किंवा स्वत: आंबेडकरही निवडून येऊ शकत नाहीत, हे सुर्यप्रकाशाइतकं स्पष्ट असताना आपला पक्ष आघाडीचा घटक असेल तर आपल्या पक्षाला १२ जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी आतापासूनच सुरू झाली आहे. जी पुरती अव्यवहारी आणि राजकारणातही टिकणारी नाही.
आघाडीत सामील करून घेण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून अधिकृत होकार आला असताना काँग्रेसकडून तो प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांनी कळवल्याचा राग आंबेडकरांना रोखता आला नाही.
पटोले यांना हा अधिकार आहे काय, असा सवाल करत आंबेडकर यांनी घटक पक्षांवरच संशय व्यक्त केला. खरं तर राष्ट्रीय पक्षाचा राज्य प्रमुख हाच राज्यातल्या आघाडीचा घटक प्रमुख असतो. अशावेळी नको त्या शंका व्यक्त करून आंबेडकर यांनी आघाडीत मिठाचा खडा टाकला. पुढे जाऊन काँग्रेस पक्ष एकाकी लढला तर त्या पक्षाच्या एकाही जागेची अनामत राहणार नाही, असं वक्तव्यं करत आंबेडकर आघाडीतील बंडखोर म्हणून ओळख निर्माण करू लागले आहेत. शिवसेनेतील फाटाफुटी प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडलं असताना स्वत:ला विरोधी मासिहा समजणारे बाळासाहेब एका शब्दात व्यक्त होताना दिसले नाहीत. उलट नार्वेकरांच्या संशयास्पद वर्तणुकीवर कडक शब्दात ताशेरे हाणणार्या सर्वोच्च न्यायालयालाच दोन शब्द सुनावून आंबेडकरांनी नार्वेकरांचीच तळी उचलल्याचं दिसून येईल.
विरोधी आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांवर आणि त्यांच्या नेत्यांवर आंबेडकरांनी केलेली टीका पाहिली तर आंबेडकर यांच्याशी कोणी जुळवून घेईल, असं आजचं चित्र नाही. दुसरीकडे राज्यातल्या राजकारणाची वासलात लावलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मात्र त्यांनी टीका केल्याचं दिसलं नाही. आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक होतील, असं वरकरणी वाटत असलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या भूमिकेवर कोणी विश्वास ठेवणार नाही अशी पार्श्वभूमी याआधीच्या निवडणुकांमध्ये त्यांची होती.
१७ व्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दोन्ही काँग्रेसच्या विरोधात एमआयएमला सोबत घेत स्वत:चे उमेदवार उभे केले तेव्हा काँग्रेस आमच्या सोबत आली तर त्या पक्षाला आम्ही १२ जागा देऊ असं वक्तव्यं करत आंबेडकरांनी आपल्यातला अहंपणा सिध्द केला होता. या निवडणुकीवेळी त्यांना भाजपने पुंजी पुरवल्याचा गंभीर आरोप झाला होता. या निवडणुकीत औरंगाबादमधून इंम्तियाज जलील निवडून आले. यातही आंबेडकर यांचं कर्तुत्व शुन्य होतं. निवडणुकीत वंचितला केवळ सात टक्के मतं मिळाली. इतरत्र ४७ उमेदवार उमेदवार उभे केल्याचा फटका दोन्ही काँग्रेस पक्षांना बसला आणि त्या पक्षांचे नऊ उमेदवार हकनाक पराभूत झाले.
त्यानंतर पार पडलेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीतही तेच झालं. वंचितने स्वत:च्या ताकदीचा अंदाज न घेताच अव्वाच्या सव्वा जागांची मागणी केली. ती अमान्य झाल्यावर सर्वत्र उमेदवार उभे केले. विधानसभेत तर मतांची ही टक्केवारी ४.६ टक्के इतकी खाली आली. २८८ जागांवर एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. पण ४० ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला. वंचितची ही न्यूसेन्स व्हॅल्यू आंबेडकरांच्या पथ्यावर पडली आणि त्यांनी ब्लॅकमेलींगचा आधार घेतला. महाविकास आघाडीतील घटक म्हणून एकीकडे चर्चा करणारा हा नेता थेट इंडिया आघाडी संपल्याचं वक्तव्यं करत असेल तर त्यांच्या मनात काय आहे, हे कोणीही सांगू शकत नाही. हे सारं पाहाता आंबेडकर हे महाविकास आघाडीसाठी शाप ठरू नयेत इतकीच अपेक्षा…

