महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नाट्य जागर उपक्रमांतर्गत झालेल्या जिल्हा नाट्यछटा स्पर्धेत संगमनेरच्या स्पर्धकांनी बाजी मारली. स्पर्धा गाजविणाऱ्या चारही स्पर्धकांची उपांत्य फेरीसाठी निवड झाल्याची माहिती देण्यात आली.
अहमदनगर केंद्राच्या स्पर्धा संगमनेरमधील दिगंबर गणेश सराफ महाविद्यालयात पार पडल्या. या स्पर्धेत श्रुती प्रमोद मैड हिने प्रथम, नमिता मंगेश सांगळे हिने द्वितीय, राजसी प्रसाद भणगे हिने तृतीय तर प्रज्ञा सनातन तायडे हिने चतुर्थ क्रमांक मिळविला. या स्पर्धकांची उपांत्य फेरीसाठी निवड झाली. याशिवाय सर्वज्ञा अविनाश कराळे, मनस्वी प्रकाश लगड, पुष्कर पंडित दशरथ, ईशीता ऊगले व दीशिता नेहुलकर यांनी देखील गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविली.

राज्यातील २६ केंद्रांवर वेगवेगळ्या सहा नाट्यप्रकारांच्या स्पर्धा होत आहेत. सुमारे दहा हजारावर स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. नाट्यछटा स्पर्धेत नगर केंद्रातून अहमदनगर, संगमनेर, कोपरगाव, राहुरी येथून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये संगमनेरच्या स्पर्धकांनी सादर केलेल्या सादरीकरणाने जिल्ह्याच्या स्पर्धेत वर्चस्व गाजविले.
नाट्यछटा स्पर्धेचे उद्घाटन सराफ महाविद्यालयाचे प्राचार्य वाकचौरे, संगीता वाकचौरे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष तथा नियामक मंडळाचे सदस्य प्राध्यापक डॉ. संजयकुमार दळवी, उपाध्यक्ष बाबासाहेब मेमाणे, स्पर्धा समन्वयक जालिंदर शिंदे, विशाल कदम यांच्या उपस्थितीत पार पडले.
सूत्रसंचालन श्रीमती दिघे आणि सुभाष कानडे यांनी केले. यशस्वी स्पर्धकांचे परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, कार्यवाह अजित भुरे, कोषाध्यक्ष सतीश लोटके, केंद्रप्रमुख क्षितिज झावरे, केंद्रप्रमुख प्राध्यापक दळवी, अमोल खोले यांच्यासह नियामक मंडळाच्या सदस्यांनी अभिनंदन केले.
उपक्रम यशस्वीतेसाठी संगमनेर शाखेचे धनंजय ढोले, विजयकुमार थिटे, दत्ता बटवाल, मोहसिन शेख, दत्ता गुजराथी, गणेश राजदेव यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेसाठी पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते.

