महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – सातत्याने केलेल्या पाठपुरावामुळे निळवंडे धरण आणि धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याचे काम पूर्ण झाले. लाभक्षेत्रात पाणी पोहोचले. मात्र या कामात कोणत्याही प्रकारची मदत न करता केवळ सातत्याने अडचणी आणण्याचे काम ज्यांनी केले, तेच आज निळवंडे धरण आणि कालव्याच्या कामाचे श्रेय घेत असल्याची टीका निळवंडे धरण आणि कालव्याचे जनक जननायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
नांदुरी दुमाला येथे उजव्या कालव्याचे जलपूजन आमदार थोरात यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी थोरात यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली. तसेच त्यांची मिरवणूक देखील काढली.

थोरात म्हणाले, १९८९ मध्ये भंडारदर्याच्या हक्काच्या पाण्याकरता मोठा लढा झाला. त्यानंतर निळवंडे धरण व कालव्यांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. आदर्शवत पुनर्वसन केले, मागील अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मोठा निधी मिळवला. त्यामुळे कालव्यांची कामे पूर्ण झाली. कोरोना संकटात शंभर फूट उंचीवर जाऊन म्हाळादेवी जलसेतूची पाहणी केली. अविरतपणे काम सुरू ठेवले. काम कोणी केले आहे, हे सर्व येथील जनतेला माहिती आहे.
ज्यांनी या कामात कधी मदत केली नाही, अडचणी निर्माण केल्या तेच लोक आता श्रेय घेण्यासाठी खटाटोप करत आहेत मात्र जनता त्यांना ओळखून आहे. संगमनेर तालुका हा विकासातून वैभवाकडे वाटचाल करतो आहे. येथील सहकार, सुसंस्कृत राजकारण सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची पद्धती ही राज्यासाठी आदर्शवत आहे.
तांबे म्हणाले, निळवंडे धरण आणि कालवे हे फक्त आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच झाले आहे. बाकीचे आता कितीही प्रसिद्धीसाठी खटाटोप करत असले तरी जनतेला सर्व काही माहिती असल्याने येथील जनता त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडणारी नाही.

आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर…
सध्याच्या राज्य सरकारमध्ये कारभार करताना कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नाही. एकमेकांवर होणारे शाब्दिक हल्ले चांगले नसून आपण लोकशाही व संविधानावर विश्वास ठेवून काम करत आहोत. त्यामुळे येत्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असेल असा विश्वास थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.

