संगमनेर – छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा महाराष्ट्राला इतिहास आहे. इतिहास केवळ घोषणा देण्यासाठी नसून प्रेरणा देणारा असतो. इतिहासात हा महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकला नाही आणि झुकणार नाही असे स्पष्ट करत गोरगरीब आणि सर्वसामान्यांचा विकास साधणारे आमदार बाळासाहेब थोरात निष्ठावंत आणि राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
येथील जाणता राजा मैदानावर आयोजित आमदार थोरात यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार निलेश लंके, आमदार सत्यजित तांबे, सत्यशील शेरकर, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, मनीष मालपाणी, उत्कर्षा रुपवते, इंद्रजीत थोरात आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कोल्हे म्हणाले, सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने विजयी होणाऱ्या आमदार थोरात यांनी शाश्वत विकासावर भर दिला. त्यांनी महाराष्ट्राचा सर्वधर्मसमभावाचा विचार जोपासला. निष्ठावंत आणि सुसंस्कृत नेतृत्व अशी त्यांची राज्यात ओळख आहे. हे नेतृत्व आपल्या सर्वांना जपायचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे संभाजी महाराज यांचा समृद्ध परंपरेचा इतिहास या राज्याला आहे. संकटे आले की लढायचं असते, पळायचे नसते. हा स्वाभिमानाचा इतिहास प्रत्येकाने जोपासला पाहिजे. ज्या संविधानाने मतदानाचा अधिकार दिला ते संविधान आणि देश वाचवण्यासाठी काम करा. मतदान कक्षात गेल्यानंतर पाच मिनिट वेळ लागतो, बटन दाबण्यासाठी पाच सेकंद लागतात. मात्र या पाच सेकंदांनी पाच वर्षाचे देशाचे भवितव्य बदलते म्हणून अत्यंत काळजीपूर्वक मतदान करा.
हा अधिकार ज्या राज्यघटनेने दिला तो राज्यघटनेचा विचार सध्या धोक्यात आहे. राज्यघटना, संविधान आणि देश टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना लढायचे आहे. देशात सध्या महागाई वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, अनेकांचा रोजगार हिरावला जातो आहे. महाराष्ट्रातून अनेक उद्योगधंदे पळवले जात आहेत. कांदा निर्यात बंदी केली आहे. फक्त जाहिरातबाजी आणि भाषणबाजीवर न जाता राज्याचा इतिहास समजून घ्या. देशाचे भवितव्य समजून घ्या असे सांगताना प्रत्येकाने देश वाचवण्यासाठी कटिबद्ध रहावे असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार थोरात म्हणाले, स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा विचार आपण जपला आहे. संगमनेर तालुक्यातील जनतेने कायम आपल्यावर प्रेम केले. विकासामध्ये आपण कधीही राजकारण केले नाही. सर्वांना बरोबर घेत विकासाचे काम केले. संगमनेरच्या जनतेमुळे आणि पक्षाच्या नेतृत्वामुळे राज्यात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी आणि राज्यातील गोरगरीब जनतेसाठी केला.
निळवंडे धरण व दोन्ही कालवे पूर्ण करून आता पाणी आले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येणार आहे. ही विकासाची वाटचाल आपल्याला कायम ठेवायची आहे. मात्र यामध्ये काही लोक अडचणी निर्माण करून पाहत आहेत. अशा लोकांना वेळीच दूर करा. आज देशाची राज्यघटना धोक्यात आली आहे. महागाई, बेरोजगारी वाढली. मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत. काँग्रेस हा राज्यघटनेचा व संत परंपरेच्या समतेचा विचार असून या विचारावर आपण काम करत आहोत.
भावे म्हणाले, राज्याला बाळासाहेब थोरात व डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. प्रास्ताविक डॉ. तांबे यांनी केले. तर डॉ. जयश्रीताई थोरात यांनी आभार मानले.

हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आमदार थोरात यांचे जंगी स्वागत व अभिष्टचिंतन…
थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जाणता राजा मैदानावर सुमारे साठ हजारावर नागरिकांची उपस्थिती होती. आमदार थोरात व डॉ. कोल्हे यांचे आगमन होताच प्रचंड टाळ्यांच्या कडकटासह आकर्षक आतिषबाजी झाली. रस्त्यांच्या दुतर्फा आमदार थोरात यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. उपस्थित जनसमुदायाने मोबाईलचे टॉर्च ऑन करून तारांगणाचा नजारा दाखवत टाळ्यांच्या कडकडाटासह अभूतपूर्व स्वागतात थोरात यांचे अभिष्टचिंतन केले.

