संगमनेर – तुम्ही आणि तुमच्या पुढच्या पिढ्या या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये जगणार आहेत की भाजपच्या हुकूमशाहीच्या गुलामगिरीत जगणार आहेत, हे ठरविणारी येणारी निवडणूक आहे. लढाई मोठी आहे असे सांगत भाजपने आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत बेंबीच्या देठापासून ओरडत ज्या भ्रष्ट लोकांविरोधात आरडाओरडा केला, ज्यांच्या-ज्यांच्यावर चिखल उडविला त्यांचीच धुनी धुण्याची वेळ त्यांच्यावर आली. ज्यांना फोडाफोडी शिवाय दुसरा धंदा नाही कपट कारस्थान, नीच कारस्थान करणारे गृहमंत्री ‘फोडणवीस’ हे घरफोडे मंत्री आहेत, अशा शब्दात भाजपच्या केंद्रीय व राज्यातील नेतृत्वावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली.
जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी संगमनेरमध्ये आले होते यावेळी ते बोलत होते. ठाकरे यांच्या समवेत खासदार संजय राऊत, नेवासाचे आमदार शंकरराव गडाख, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, सध्या घरगड्यासारखा ईडी, सीबीआय, पोलीस आधी संस्थांचा गैरवापर सुरू आहे. या संस्था, पोलीस बाजूला ठेवा, संरक्षण बाजूला ठेवा आपण जनतेत जाऊ चर्चा करू. लोक कोणाला डोक्यावर घेतात, कोणाला पायदळीत तूडवतात ते बघा. काँग्रेस, शरद पवारांनी मला धोका दिला नाही तर माझीच माणसं फोडून माझा घात करत मला धोका फसनविसांनी दिला आहे.
भाजप संघाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आवाहन करत ते म्हणाले, आमची २५-३० वर्षे वाया गेली. त्यांच्या हिंदुत्वाच्या बुरख्याला आम्ही फसलो. ज्यांना दिल्लीला पाठवले, ते तेथे गेल्यावर आमच्याच मुळावर घाव घालत आहे. आज केवळ पक्ष फोडाफोडीचे काम सुरू आहे. आत्ताची भाजप नेतृत्वाची फळी कोणाचीही नसून त्यांची ही वृत्ती बघितल्यानंतर भाजप आणि आरएसएस च्या कार्यकर्त्यांनी सावध होण्याची गरज आहे. ज्या शिवसेनाप्रमुखांनी मोदींना त्यावेळी वाचविले, त्यांच्याच शिवसेनेला आज हे खतम करायला निघाले आहे. त्यांची काय औकात आहे हे लक्षात घ्या.
मुख्यमंत्री शिंदे यांचा उल्लेख करत मिंधेने आधी आपली दाढी सांभाळता येते का ते बघावे, मग शिवधनुष्य उचलावं आणि ते पेलूनच दाखवावं असं आव्हान देत शिवसेनेला फोडण्याचे पाप या गद्दारांनी केले आहे. शिर्डीच्या खासदारांनी ही गद्दारी केली. त्यामुळे आता या सर्व गद्दारांची निशाणी धनुष्यबाण नसून त्यांच्या कपाळावर बसलेला गद्दारीचा शिक्का हीच त्यांची निशाणी आहे. एक तर त्यांनी घरी बसावं किंवा गद्दारीचा हा शिक्का घेऊन लोकांसमोर जावं.
जर मी पक्षप्रमुख नव्हतो तर निवडणुकांवेळी अमित शहा कशासाठी माझ्या घरी आले होते असा प्रश्न उपस्थित करत ठाकरेंच्या घराणेशाहीची मोदींना माहिती नव्हती का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराच्या आरोप केले ते लोक तुमच्या सोबत आले, हीच का तुमची मोदी गॅरंटी असे देखील ठाकरे म्हणाले.

- बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख यांचे केले धन्यवाद व्यक्त… अपक्ष निवडून आलेले शंकरराव गडाख आमच्या सोबत राहिले. विधानसभेत कधी गेलो नव्हतो. मात्र अचानक मुख्यमंत्री व्हावे लागले. माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या थोरात यांनी मी नवखा आहे, असं कधी मला भासू दिले नाही. मला सांभाळून घेतले. यासाठी मनाचा मोठेपणा दिलदारपणा लागतो, असे स्पष्ट करत ठाकरे यांनी आमदार थोरात, आमदार गडाख यांना धन्यवाद दिले. उत्तर नगर जिल्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड असल्याचा उल्लेख करत या भागात आपल्याला आघाडी घेण्याइतपतही मतं मिळत नसल्याचे स्पष्ट करून आता या किल्लेदारांमुळे महाविकास आघाडीची ताकद वाढल्याचे ठाकरे म्हणाले.
- अपुरे व्यासपीठ, व्यासपीठावरील गर्दीमुळे ठाकरेंच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह? संगमनेर बस स्थानकाच्या व्यापारी गाळ्यांसमोर ठाकरेंच्या जनसंवाद यात्रेसाठी एका मंडपाची उभारणी करण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री असलेल्या ठाकरे यांच्या सभेसाठी येथे उभारण्यात आलेले व्यासपीठ अपुरे होते. व्यासपीठावरील गर्दी आणि परिसरातील नागरिकांची गर्दी लक्षात घेता ठाकरेंच्या दौऱ्यातील सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाल्याचे दिसत होते.


