संगमनेर – शहर आणि लगतच्या उपनगरांना जोडणारा तसेच गंगामाई घाटाकडे जाणारा स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिरा दरम्यानचा म्हाळुंगी नदीवरील पूल खचून दोन वर्षाचा कालावधी होत आहे. स्थानिक नागरिकांसह संगमनेरकर पूल दुरुस्तीसाठी सातत्याने आंदोलन करत आहे, मात्र या पुलाचे बांधकाम भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळेच रखडल्याचा व नागरिकांच्या त्रासाला पालकमंत्री विखे पाटीलच जबाबदार असल्याचा आरोप संगमनेर नगर परिषदेतील माजी युवा नगरसेवक शैलेश कलंत्री यांनी केला आहे.
या संदर्भात कलंत्री म्हणाले, ऑक्टोंबर २०२२ मध्ये म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील पूल खचल्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी तातडीने परिस्थितीची पाहणी केली. या पुलाच्या बांधकामासाठी निधी मिळावा यासाठी सर्वप्रथम काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व युवा आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे निधीची मागणी करत पाठपुरावा केला.
मात्र हा पूल होऊ नये यासाठी भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुलाचे राजकारण केले. नगरपालिका प्रशासन, राज्य व केंद्रात सत्ताधारी असणारे भाजपा आणि विद्यमान पालकमंत्री विखे यांनी संगमनेरकरांना त्रास देण्याकरता येथील अनेक विकासकामे रोखली आहेत यामध्ये या पुलाचा देखील समावेश आहे.

थोरात, तांबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत पूलाच्या निर्मितीसाठी साडेचार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. मात्र स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुका लक्षात घेत या कामाचे श्रेय घेण्यासाठी व स्थानिक नागरिकांच्या मनात येथील लोकप्रतिनिधी विरोधात द्वेष भावना निर्माण करण्याच्या हेतूने यात पालकमंत्र्यांमार्फत खोडा घातला.
मागील अडीच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत. नगरपालिकेमध्ये प्रशासक राज सुरू आहे. राज्यात व केंद्रात भाजपाची सरकारे आहेत. सत्तेच्या लालसेपोटी विखे हे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले आहेत. त्यांच्याकडे आता महत्त्वाचे महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील आहे. जिल्ह्यात प्रशासनावर आणि निधी वाटपात त्यांची सत्ता चालते. अशावेळी त्यांनी या कामासाठी एक रुपयाचाही नवीन निधी उपलब्ध करून दिला नाही. उलट आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून तहसील कार्यालयाजवळ सुरू असलेल्या शॉपिंग सेंटरचे काम अर्धवट बंद करून तो निधी म्हाळुंगी नदीवरील पुलाकरता वळविला.
खरे तर मंत्री विखे यांनी असे न करता नवीन निधी मिळवायला हवा होता. परंतु सुरू असले काम बंद पाडून तो निधी पुलाच्या कामाला वळवण्याचा अट्टाहास केला, असे असतानाही मागील दीड वर्षापासून हे काम बंद आहे. नवीन पुलाच्या उभारणीसाठी आमदार बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा केला आहे. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र जाणीवपूर्वक हा प्रश्न राजकीय श्रेय वादात अडकविला गेला.
भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष याच प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. त्यावेळी राज्यात भाजपाची सत्ता होती. साईनगरसाठी संरक्षक भिंत आणि म्हाळुंगी नदीवरील छोटा पूल करणे एवढीच या भागातील नागरिकांची अपेक्षा होती. मात्र त्यांची एवढी सुद्धा पत नसल्याने इतका छोटा निधी ते मिळू शकले नाहीत.
आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून होत असलेली संगमनेर तालुक्यातील विकासकामे अडून धरायची. नागरिकांना त्रास द्यायचा हा उद्देश असलेल्या मंत्री विखे यांनी संगमनेर शहरातील पंपिंग स्टेशन, साईनगर ,घोडेकर मळा या परिसरातील नागरिकांची गैरसोय करत स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून फक्त श्रेयवादासाठी हे काम जाणीवपूर्वक रखडवले आहे. या कामाच्या निघालेल्या वर्क ऑर्डरलासुद्धा भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे स्टे देण्यासाठी प्रयत्न केला आहे.
म्हाळुंगी पूलाचे रखडलेले काम, नागरिकांची झालेली गैरसोय, विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड या सर्व बाबींना भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आणि मंत्री विखेच जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली असून संगमनेरमधील सुजाण नागरिक भाजपाचे हे षडयंत्र जाणून असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

