संगमनेर – राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज बुधवारी (ता. २१ फेब्रुवारी) विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमनेर दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्या दरम्यान विखे यांच्या हस्ते म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पूलाच्या कामासाठी भूमिपूजन होत आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या या पुलाचे काम सुरू व्हावे या मागणीसाठी म्हाळुंगी पूल बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे उपोषणकर्त्यांवर प्रशासनाकडून दडपशाही सुरू असून उपोषणकर्त्यांचा मंडप हटविण्यात आला आहे.
पूलासाठी आवश्यक निधीची उपलब्धता न करता सुरू असलेल्या विकास कामांचा निधी संबंधित काम बंद करून या पुलासाठी वर्ग करण्यात आला आहे. पूलासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे श्रेय घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता थेट पालकमंत्र्यांनाच “पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील सेतू पुलाच्या” भूमिपूजनासाठी बोलावले आहे.
दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या साखळी उपोषणकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी तेथे बसू नये यासाठी प्रशासनाकडून मोठा दबाव आणत दडपशाहीने उपोषणकर्त्यांचा मंडप हटविण्यात आला. यामुळे आंदोलनस्थळी बराच वेळ गोंधळाचे वातावरण सुरू होते.
तर दुसरीकडे आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहे. या परिसरात असलेल्या देवेंद्र ओहरा महाविद्यालयात परीक्षा केंद्र असल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिक नागरिकांसोबत या परीक्षार्थी तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील मोठी कसरत करत ये – जा करावी लागत आहे.
दरम्यान उपोषण करता आंदोलकांनी भाजपाने फुकटच्या श्रेयासाठी प्रशासनाला पुढे करत दडपशाही सुरू केले आहे. ज्यांचे काहीच योगदान नाही, त्यांचा भूमिपूजनाचा आणि नाव देण्याचा काय संबंध असा प्रश्न उपोषणकर्त्या आंदोलकांनी उपस्थित केला आहे.
उपोषणाला बसलेल्या नागरिकांनी प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या दडपशाहीच्या कारवाईस तीव्र विरोध दर्शवला. यावेळी शांततेच्या मार्गाने उपोषण करणाऱ्या सर्वांना तेथून उठवण्यात आले तर त्यांचा उपोषणाच्या मंडपही हटवण्यात आला आहे.या विरुद्ध संघर्ष समितीच्यावतीने किरण पाटणकर, अमोल डुकरे, बंटी पवार, बंडू म्हाळस, राकेश परदेशी, संकेत पाटणकर, कैलास साळुंखे यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी मोठा विरोध दर्शवला आहे.
सायंकाळी होत असलेल्या पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ निर्माण होऊ नये, मंत्री महोदयांना स्थानिक नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये यासाठी सतर्क झालेल्या प्रशासनाकडून सकाळपासून सतर्कता बाळगली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण संगमनेरमध्ये संतापाची लाट उसळली असून सोशल माध्यमांवर या दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे.