संगमनेर, दि. २६
कोल्हार-घोटी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास जात आहे. मात्र याच मार्गाचा भाग असलेल्या आणि शहरातून जाणाऱ्या तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतच्या मार्गाचे मजबुतीकरण, डांबरीकरणासह अपूर्ण काम तातडीने करण्याची मागणी संगमनेर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेंद्र वाकचौरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधितांकडे केली आहे.
तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतचा बहुतांशी भाग वाकचौरे नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये मोडतो. संगमनेरमध्ये कोल्हार घोटी मार्गाच्या पूर्णत्वाचे काम बहुतांशी झाले असल्याने या कामातून तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतचा म्हणजेच मेनरोडचे काम झाले नसल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या या रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरणाचे काम वेगात असून याच रस्त्यावरील माळीवाडा ते अकोले नाका पूल हा रस्ता तसेच तीन बत्ती चौकापर्यंतचा भाग गेल्या एक वर्षापासून अपूर्ण आहे. यामुळे धुळीच्या प्रदूषणासह वाहनचालक, पादचाऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. यातच छोटे-मोठे अपघात देखील सातत्याने होत असल्याचे वाकचौरे यांनी म्हटले आहे.
प्रभागातील नगरसेवक या नात्याने नागरिकांनी या संदर्भातील तक्रारी वाकचौरे यांच्याकडे मांडल्या. तसेच संबंधितांकडून रस्त्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली. या संदर्भात संबंधितांशी वेळोवेळी संपर्क करूनदेखील काम होत नसल्याने या मागणीसाठी माजी नगरसेवक वाकचौरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हे निवेदन दिले आहे.
बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता ओ. बी. तांबारे यांनी तर संगमनेर नगर परिषदेच्यावतीने उपमुख्याधिकारी संजय पेखळे यांनी हे निवेदन स्वीकारले आहे. सदरचा अपूर्ण रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नागरिकांना तीव्र आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका, अशीदेखील अपेक्षा वाकचौरे यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.
तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची माजी नगरसेवकाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी
संगमनेर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही निवेदन

