सोलापूर, येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने शेकडोने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. एकट्या बीडमध्ये साडेतीन हजार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोक तयार आहेत. निवडणुकीत एवढे उमेदवार उभे राहताय की, आता यांचे चिन्हच दिसणार नाही. आम्हाला न्याय मिळत नसेल तर, आधी दोन कोटी मराठा घेऊन आलो होतो आता चार कोटी मराठा घेऊन येईल असा दणदणीत इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
जरांगे सोलापूरमधील सभेत बोलत होते. ते म्हणाले समाजाने लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मराठा समाजाचा आहे. मी समाजाचा मालक नाही, समाज माझा मालक आहे.
फडणवीसांची भाषा आता मुख्यमंत्री बोलू लागलेत… उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बोलू लागले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे शब्द ऐकत आम्ही सहा महिने त्यांना वेळ दिला. आता मात्र ते देखील आम्हाला बोलू लागले आहेत. मात्र मर्यादा संपली की मराठे करेक्ट कार्यक्रम करत असतात.
९ तारखेपर्यंत वाट बघणार… नऊ तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत, त्यानंतर काय निर्णय घ्यायचा तो घेऊ. आता आरक्षण गनिमी काव्याने कसे मिळवू, ते तुम्हाला दाखवून देऊ, असे देखील जरांगे म्हणाले.

