संगमनेर दि. ६ मार्च
युवक काँग्रेसच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांची तर जिल्हा सरचिटणीसपदी निलेश थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. जयश्री थोरात यांची या माध्यमातून सक्रिय राजकारणात वाटचाल सुरू झाली असून या माध्यमातून नव्या युवा पर्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे प्रभारी उदयभानू, जिल्हा प्रभारी रोहित कुमार आणि सहप्रभारी एहसान खान यांनी ही निवड जाहीर केली. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी डॉ. जयश्री यांच्या निवडीची घेषणा केली.
डॉ. थोरात या कॅन्सर तज्ज्ञ असून मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. अभ्यासू आणि सेवाभावी वृत्तीमुळे अल्पावधीतच त्यांनी कॅन्सर उपचाराच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला. त्या कॅन्सर रुग्णांना टाटा हॉस्पिटल आणि एसएमबीटी हॉस्पिटल येथे योग्य उपचारांच्या बाबतीत मार्गदर्शन करतात. ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांवर उपचार करत असताना डॉ. जयश्री यांच्या लक्षात आले की जनजागृती अभावी कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला अनेक महिला बळी पडत आहे. या गंभीर प्रश्नावर व्यापक काम करण्याच्या हेतूने त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर आधारित एकविरा फाउंडेशनची स्थापना केली.
महिलांसाठी आरोग्य शिबिरे, व्यावसायिक प्रशिक्षण, बचत गटांना मार्गदर्शन, सायकल वाटप, शालेय साहित्याचे वितरण, क्रीडा स्पर्धा, गुणदर्शन कार्यक्रम आदी माध्यमातून त्यांनी संगमनेर तालुक्यात महिला आणि मुलींसाठी अल्पावधीत मोठे काम उभे केले. सामाजिक कार्यासोबतच लोकनेते बाळासाहेब थोरात यांना मदतरूपी भूमिका घ्यायला त्यांनी सुरुवात केली होती.
“युवा संवाद” या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील १५३ गावातील प्रमुख युवक कार्यकर्त्यांच्या, दीडशेहून अधिक बैठका घेऊन त्यांनी संवाद साधला. युवासंवादच्या माध्यमातून समोर आलेल्या बहुतांश प्रश्नांची यशोधन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी सोडवणूक केली.
डॉ. जयश्री यांनी कार्यकर्ता बनून संघटनेचे काम करण्याला प्राधान्य दिले ही आनंदाची बाब आहे. त्यांच्या रूपाने युवक काँग्रेसला अभ्यासू, उच्चशिक्षित आणि सेवाभावी चेहरा मिळाला असल्याची भावना युवकचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी व्यक्त केली.
संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे सध्याचे अध्यक्ष निलेश थोरात यांची अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली असून, संगमनेरसारख्या व्यापक तालुक्यात काम करण्याचा थोरात यांचा अनुभव जिल्ह्याच्या युवक काँग्रेसला नक्की उपयोगी पडेल असा आशावाद, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी व्यक्त केला.
युवक कार्यकर्त्यांचा आग्रह… डॉ. जयश्री थोरात यांची सेवाभावी वृत्ती आणि प्रश्न सोडवण्याची हातोटी यामुळे प्रभावित झालेल्या युवक कार्यकर्त्यांनी डॉ. जयश्री यांना युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद स्वीकारण्याची गळ घातली. यापूर्वी युवक काँग्रेसने घेतलेल्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मागील वर्षी महाराष्ट्रात आलेल्या भारत जोडो यात्रेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता, तेव्हापासूनच त्या काँग्रेस पक्ष संघटनेत सक्रिय झाल्या होत्या.

काँग्रेसचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम करणार…
काँग्रेसचा विचार हा माझ्या कुटुंबात गेल्या शंभर वर्षांपासून रुजलेला आहे. राजकारणात सत्ता आल्या आणि गेल्या मात्र माझे वडील लोकनेते बाळासाहेब थोरात हे कायम काँग्रेस विचारांशी बांधिल राहिले. काँग्रेसचा विचार हा शाश्वत आहे आणि तो सर्वसामान्य माणसाच्या हिताचा आहे, ही बांधिलकी त्यांनी माझ्यातही रुजवली आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष संघटनेत काम करण्याची संधी मला मिळालेली आहे, शेवटच्या माणसापर्यंत काँग्रेसचा विचार पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहील.संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात युवकांचे संघटन मजबूत करण्यावर माझा भर राहील. माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी काँग्रेस पक्ष आणि नेतृत्वाचे आभार मानते. डॉ. जयश्री थोरात.

