अहमदनगर, दि. ७ मार्च
केवळ सत्तेसाठी भाजपमध्ये नव्याने आलेल्या लोकांमुळे जुन्या निष्ठावंतांवर अन्याय सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षांच्या एका निर्णयामुळे संगमनेर भाजपाची अंतर्गत धुसफूस समोर आली, असे असले तरी स्वतःचाच निर्णय पुन्हा फिरविण्याची आफत भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर ओढावली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर नगर जिल्ह्यातही विखे व्हर्सेस भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमधील हा संघर्ष सातत्याने बघावयास मिळत आहे.
नव्या जुन्यातील संघर्ष आणि अंतर्गत वादामुळे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे चांगलेच अडचणीत सापडले असल्याचे दिसत आहे. बुधवारी संगमनेर तालुका मंडळ कार्यकारिणी रद्द केल्याचा स्वतःचाच दिलेला आदेश गुरुवारी पुन्हा २४ तासाच्या आत फिरविण्याची व आहे तीच कार्यकारिणी पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याची आफत त्यांच्यावर ओढवली. यामागे जिल्ह्यातील मातब्बर नेत्याचा हात असल्याची चर्चा भाजप वर्तुळात रंगली आहे. या निर्णयामुळे अंतर्गत असलेला सुप्त असंतोष आता उफाळून आला आहे.
जिल्हाध्यक्ष लंघे यांनी दोन-तीन महिन्यांपूर्वी संगमनेरची तालुका कार्यकारिणी जाहीर केली होती. यात वैभव लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली होती. यानंतरही पक्षात नवे-जुने असा वाद रंगला होता.
निष्ठावांतांवर अन्याय झाल्याची ओरड त्यावेळी देखील करण्यात आली मात्र पक्षांतर्गत बाब असल्याने याची जाहीर वाच्यता होऊ शकली नाही. यातच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची, काही ठराविक लोकांनाच महत्त्व दिले जात असल्याची व काही ठराविक लोकांचा हस्तक्षेप वाढल्याची चर्चा देखील सुरू होती. जिल्ह्यातही विखे पिता पुत्रांविरोधात भाजपाच्या राम शिंदे यांनी उघडपणे विरोधाची भूमिका घेतली होती. शिंदे यांना पक्षांतर्गतच बळ मिळाल्याने त्यांनी नगर दक्षिणच्या उमेदवारीवरही आपला हक्क सांगितला.
संगमनेरमध्ये देखील असेच वादाचे पडसाद उमटत होते. दोन दिवसापूर्वी झालेल्या पक्ष बैठकीत देखील याचे पडसाद उमटल्याने व भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने टाकलेल्या दबावातून बुधवारी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या सहीने तालुका अध्यक्ष वैभव लांडगे यांना पत्र धाडण्यात आले. या पत्राद्वारे जिल्हाध्यक्षांनी संगमनेर तालुका कार्यकारिणी रद्द ठरविली होती.
मात्र याची दखल थेट वरिष्ठ पातळीवरून प्रदेश कार्यालयाकडून घेण्यात आली. आणि २४ तास उलटण्याच्या आतच जिल्हाध्यक्षांवर पुन्हा दुसरे पत्र धाडत वरिष्ठ नेते प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर पुढील निर्णय होईपर्यंत स्वतःच्याच निर्णयाला स्थगिती देत असल्याचे सांगण्याची आफत ओढावली. यामुळे भाजपमधील असंतोष समोर आला असून अंतर्गत पत्रप्रपंच व दबाव टाकणाऱ्या नेत्याबद्दल चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप जिल्हाध्यक्षांनी संगमनेरची कार्यकारिणी केली बरखास्त आणि पुन्हा २४ तासात… भाजपातील अंतर्गत धुसफूस आली समोर!
पक्षात नवे जुने वाद उफाळला!

