भोजापूर पूरचारीच्या २ कोटी १२ लाख रुपयांच्या निधीतून सोळा किलोमीटर लांबीच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन
७७ कोटी रुपयांचा निधी मिळवला, मात्र सत्ता बदल होताच नव्या सरकारने या निधीला स्टे लावला
दि. १० मार्च, संगमनेर
तळेगाव भागातील दुष्काळी गावांना पाणी मिळावे, या हेतूने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून भोजापूर पूरचारी करण्यात आली. दरवर्षी कारखाना या चारीची दुरुस्ती करत असतो. यामुळे परिसरातील गावांना पाणी मिळते. मात्र या चारीच्या कामात ज्या लोकांचे योगदान नाही, ज्यांचा हेतू चांगला नाही, असे लोक या परिसरात येऊन आपसात मनभेद निर्माण करत आहे. अशा प्रकारच्या लोकांना थारा देऊ नका, असे स्पष्ट करत नव्याने सोनेवाडी ते तिगाव माथा या १६ किलोमीटरच्या चारीच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे. येणाऱ्या काळात पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, सर्वांना पाणी मिळेल यासाठी काम केले जात असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
तिगावच्या वटमादेवी येथे भोजापूर पूरचारीच्या २ कोटी १२ लाख रुपयांच्या निधीतून सोळा किलोमीटर लांबीच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेस अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश सोनवणे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
थोरात म्हणाले… थोरात कारखान्याच्या माध्यमातून त्यावेळी ८५ लाख रुपयांच्या निधीतून भोजापुर चारी करण्यात आली होती. जलसंधारण मंत्री असताना आपण ही चारी त्यावेळी जलसंधारण विभागाकडे वर्ग केली. या परिसरातील दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी दरवर्षी कारखान्याच्या माध्यमातून या चारीचे काम केले जाते. मात्र यात ज्यांचे योगदान नाही असे लोक आता तुमच्यात मनभेद निर्माण करत आहे. त्यांनी देखील ३५ वर्षे प्रतिनिधित्व केले मात्र त्यांनी काय काम केले हा मोठा प्रश्न असून आता सत्ता आल्याने ते अडवणूक करत आहे. काही खबरे तालुक्यात काम करत असून त्यांना थारा देऊ नका. खोट्या केसेस करून तालुक्यात दडपशाही निर्माण केली जात आहे.
तालुक्यातील रस्त्यांच्या विविध कामासाठी आपण ७७ कोटी रुपयांचा निधी मिळवला, मात्र सत्ता बदल होताच नव्या सरकारने या निधीला स्टे लावला होता. सर्वोच्च न्यायालयातून आता हा स्टे उठविला गेला असून चिंचोली-मालदाड रस्त्याचे काम देखील सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्याचे राजकारण हे अत्यंत दुर्दैवी वळणावर सुरू आहे. अनेक लोक पक्ष बदलतात, पक्ष बदलणे म्हणजे ज्या आईने वाढविले. लहानचे मोठे केले त्या आईला विसरण्यासारखे आहे. लोकशाही धोक्यात आली असून ईडी, सीबीआयचा धाक दाखविला जात आहे. खोके सरकारमध्ये असलेली दुफळी उघड झाली आहे. विकासाचा कोणताही मुद्दा त्यांच्याकडे नसून धार्मिकतेच्या नावावर राजकारण सुरू आहे. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाला. राष्ट्रीय कुस्तीगीर महिला पटूवर अत्याचार झाला, त्यावेळी सरकार गप्प होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी त्यांना काही देणे घेणे नाही. दिल्लीच्या वेशीवर आलेल्या शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे ठोकले जातात. त्यांच्यावर अश्रूधूराचा मारा केला जातो, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तांबे म्हणाले… सध्या लोकशाही धोक्यात आली आहे. देशात भीतीचे वातावरण आहे. अनेक जण भविष्याच्या घोषणा करतात. मात्र त्यांचा भूतकाळ पहा. येणारा काळ हा निवडणुकीचा असून अनेक भुलथापा दिल्या जातील. लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी अशा भूलथापांना बळू पडू नका.
जयश्री थोरात म्हणाल्या… संगमनेर तालुक्याला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. हाच वारसा आपल्याला जोपायचा आहे. सतत चांगले काम करा हे तत्व साहेबांनी आपल्या सर्वांना दिले आहे. साहेबांनी कधीही कुणाचे वाईट केले नाही. तरुणांनी सर्वांनी एकत्र येऊन ही विकासाची वाटचाल पुढे न्यायची असून गाव तेथे युवक काँग्रेसच्या शाखा सुरू करणार आहे.
सचिन दिघे, बी. आर. चकोर, पांडुरंग फड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाबासाहेब कांदळकर, अनिल कांदळकर, साहेबराव गडाख, त्र्यंबक गडाख, शंकर ढमक, शेखर वाघ, अनिल घुगे, बाबासाहेब कडनर, विलास सोनवणे, राजेंद्र मुंगसे, ज्ञानेश्वर मुंगसे, सखाराम शरमाळे, किसनराव सुपेकर आदींसह परिसरातील युवक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक रमेश सानप यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर शंकर ढमक यांनी आभार मानले.
राज्य पातळीवरही संगमनेरचा सन्मान… महाविकास आघाडीचे जागावाटप, न्याय यात्रा, लोकसभा निवडणूक जागावाटप अशा सर्व प्रक्रियांमध्ये आपला समावेश होत असून विधानसभेतही सर्वपक्षीय आमदार आदर करतात. सुसंस्कृत राजकारण आणि सर्वांना बरोबर घेण्याची आपली पद्धत आहे. यामुळे राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपला नव्हे तर संगमनेर तालुक्याचा सन्मान होत असून वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनीदेखील तत्व व विचारांवर काम करणारे व्यक्तिमत्व असल्याचे म्हटले असल्याचे आमदार थोरात यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

