दि. १३ मार्च, संगमनेर
संगमनेरच्या शांततेला गालबोट लावणारे जोर्वेनाका येथील प्रकरण न्यायप्रविष्ट होत नाही तोच आता पुन्हा एकदा कोल्हेवाडी-दिल्ली नाका रस्त्यावर जमावाकडून चिमुकल्या लेकींसमोर पित्यासह तिघांना मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शहरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात दंगल नियंत्रक पथकाची कुमक देखील मागविण्यात आली आहे.
मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर रात्री उशिरा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांचा मोठा जमाव जमला होता. घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत असून दरम्यान या प्रकरणी शहर पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत दुपारपर्यंत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
राहुल सोपान गुंजाळ (वय ३८ वर्ष, रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) हा तरुण मंगळवारी सायंकाळच्या वेळी आपल्या दोन चिमुकल्या मुलींना घेऊन दुचाकी वरून कोल्हेवाडी रस्त्याने संगमनेरकडे येत होता. कोल्हेवाडी रोड-दिल्ली नाका परिसरात त्याच्या दुचाकीला पिकअप चालकाने कट मारला. कट मारल्यानंतर रागाने बघितल्याने दुचाकी थांबवून राहुल गुंजाळ कट का मारला असे विचारण्यासाठी पिकअप चालकाजवळ गेला असता पिकअप चालकाने डोळ्यात धुळ जात असेल तर गॉगल घाल, असे म्हणत वाद उत्पन्न करत त्याच्या दोन मुलींसमोरच त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार बघून तेथे मोठा जमाव जमला. जमलेल्या जमावाने देखील गुंजाळ याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यांच्या तावडीतून बचावलेल्या तरुणाने फोनवरून आपल्या काही मित्रांना मदतीसाठी बोलावून घेतले. घटनास्थळी आलेल्या त्याच्या मित्रांनादेखील जमावाकडून मारहाण करण्यात आली. यावेळी तरुणाच्या दोन्ही मुली मोठा आक्रोश करत होत्या. मात्र तरी देखील जमावाकडून राहुल गुंजाळ, संदीप गुंजाळ, अमोल गुंजाळ यांना मारहाण सुरूच होती. जमावाच्या तावडीतून बचावलेल्या आणि बेदम मारहाण झालेल्या तरुणांनी पोलीस ठाण्यात येत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याचे काम सुरूच होते. तर जखमी राहुल सोपान गुंजाळ, संदीप सोमनाथ गुंजाळ व अमोल संजय गुंजाळ यांना उपचार व वैद्यकीय तपासणीसाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते.
दरम्यान या प्रकरणी शहर पोलिसांनी नेमकी कोणती कारवाई केली या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता माहिती मिळू शकली नाही.
काही दिवसांपूर्वी शहरातील जोर्वेनाका परिसरात जोर्वे येथील अशाच किरकोळ कारणातून काही लोकांना मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. याचे पडसाद देखील मोठ्या प्रमाणात संगमनेर मध्ये उमटले होते. शहरातील शांततेला गालबोट लावणारी या परिसरातील अतिक्रमणे पोलिसांनी पालिकेने तातडीने हटविली. अतिक्रमण आणि वाहन चालकांनी बेदरकारपणे उभी केलेली वाहने यामुळे या परिसरात मोठी वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. हा परिसर अतिक्रमण मुक्त करून तेथे पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली. मात्र या चौकीला अद्यापही मुहूर्त लाभलेला नाही. असाच काहीसा प्रकार कोल्हेवाडी रोड ते दिल्ली नाका परिसरात अनुभवण्यास येत असून प्रशासन या प्रकरणी नेमकी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
चिमुकल्यांचा आक्रोश बघा व्हिडिओ…
मंगळवारी सायंकाळी दिल्ली नाका कोल्हेवाडी रोड येथील घटनेसंदर्भात पोलीस विभागाकडून गंभीर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सर्व आरोपीवर कायदेशीर कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात येईल. कोणीही शहरात अफ़वा पसरवू नये. शांततेचे पालन करावे. सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर

