शनिवार दि. २३ मार्च, अहमदनगर
पुन्हा उमेदवारी मिळाल्यानंतर पाच वेळा माफी मागायची वेळ यायला नको होती. अशी खासदार विखे यांचे नाव न घेता टिपणी करत भारतीय जनता पक्षाने महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ. सुजय विखे यांना नगर दक्षिणेतून पुन्हा उमेदवारी दिली असती तरी गेल्या पाच वर्षात घडलेल्या घटनांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच माझी नाराजी कोणत्या मुद्द्यावर आहे हे स्पष्ट करेल, असे विधान परिषदेचे आमदार माजी मंत्री राम शिंदे यांनी सांगितले.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना अंतर्गत मोठा विरोध होताना दिसत आहे. आमदार राम शिंदे यांच्यासह भाजपातील अनेक नेत्यांनी थेट विरोधाची भूमिका घेतल्याने निष्ठावंत भाजप विरुद्ध विखे यंत्रणा असे चित्र या मतदारसंघात विखे विरोधात विरोधी उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरण्यापूर्वीच निर्माण झाले आहे. दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील नगर मधील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा संपल्यानंतर आमदार राम शिंदे यांची भेट घेत दोघांमध्येच बैठक झाली ही बैठक शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी असे बोलले जाते. मात्र शुक्रवारी झालेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाथर्डी दौऱ्यावेळी देखील शिंदे यांनी अनुपस्थिती दर्शविली होती. यामुळे शिंदे अद्यापही नाराज असल्याचे स्पष्ट दिसते.
या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आता महत्त्वाचे विधान केले आहे. तिकीट जाहीर झाल्यानंतर पाच वेळा जाहीर माफी मागण्याची वेळ यायला नको होते अशी टिपणी विखे यांचे नाव न घेता शिंदे यांनी नगरच्या वाडिया पार्कमध्ये आयोजित राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना केली. ते म्हणाले, नगर दक्षिणेतून उमेदवारीसाठी मीही इच्छुक होतो. आधीही दोन निवडणुकांच्या काळात मी इच्छुक होतो. मात्र आता डॉ. विखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कोणत्या निकषावर मला उमेदवारी मिळाली नाही, हे मला सांगता येणार नाही. मात्र विखेंना उमेदवारी मिळाल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीदेखील दिली आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माझ्याशी केलेल्या चर्चेत मी काही मुद्दे उपस्थित केले होते. त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबई भेट घेतली असल्याचे समजते. मात्र फडणवीस यांच्याकडून मला अजून पर्यंत काहीही निरोप आलेला नाही. पण नाराजी संदर्भात मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर फडणवीस यांच्या स्तरावर चर्चा होईल, त्यानंतरच ते मुद्दे काय होते हे मी स्पष्ट करेन. मागे चार-पाच वर्षात घडलेल्या विविध घटना व मुद्द्यांचे निरसन होणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले.


