रविवार दि. २४ मार्च, संगमनेर
बस स्थानकावरील कॉम्प्लेक्समध्ये औषधे खरेदी करण्यासाठी आलेल्या मुस्लिम तरुणाला रागाने का बघतो, असे विचारणा करत ‘जय श्रीराम’ म्हणण्यासाठी त्याला आठ ते नऊ जणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी बस स्थानकावर घडला. या घटनेमुळे शहरात सर्वत्र अफवांचे पेव फुटल्याने बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात दोन्ही गटाच्या नागरिकांची गर्दी जमली यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरातील वातावरण तणावपूर्ण बनलेले आहे. या घटनेमुळे संगमनेर शहराचे वातावरण ढवळून निघाले असून शहराची शांतता धोक्यात आली आहे. शहरात तणावाचे वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकारी संगमनेर तळ ठोकून आहेत.
दरम्यान बस स्थानकावर घडलेल्या प्रकारावेळी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबुर्मे, संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे आदींसह विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी बराच वेळ तळ ठोकून होते. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना यावेळी सौम्य लाठीमारही करावा लागला.
याबाबत हुजेब अय्याज शेख (वय २५ वर्षे, रा. मोमीनपुरा, संगमनेर) याने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय धुमाळ, गोल्या ठाकूर, अमोल मिश्रा यांच्यासह पाच ते सहा जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.
शेख याने फिर्यादीत म्हटले आहे की, मी संगमनेर बसस्थानकावर एका मेडिकल स्टोअरमध्ये औषधे घेण्यासाठी आलो असता तीन-चार जणांच्या टोळक्याने माझ्याकडे रागाने पाहत पुढे जाऊन पुन्हा परत आले व आमच्याकडे रागाने का बघतो म्हणून मला दमबाजी करू लागले आणि ‘जय श्रीराम’ म्हण नाहीतर तुझ्याकडे बघावे लागेल, तुम्ही लांडे खूप माजले आहात असे म्हणत मला लाथाबुक्याने मारहाण सुरू केली.
त्याचबरोबर इतर पाच-सहा जण देखील सामील होऊन मला शिवीगाळ करत लाथा बुक्क्याने मारहाण करू लागले. त्यांच्या तावडीतून सुटून जवळच असलेल्या एका सराफाच्या दुकानासमोरून पळत असताना माझ्या पाठीमागे कोणीतरी वीट फेकून मारली. परंतु वीट मला लागली नाही. त्यानंतर मी घुलेवाडीकडे जाणाऱ्या रिक्षा स्थानकाजवळ जाऊन थांबलो. त्यावेळी अक्षय धुमाळ, गोल्या ठाकूर, अमोल मिश्रा हे तिघे जण आणि पाच ते सहा अनोळखी लोक माझ्या जवळ येऊन मला पुन्हा लाथाबुक्याने मारहाण करू लागले. मारहाण करत असताना गोल्या ठाकूर याने हातातील काहीतरी टनक वस्तूने माझ्या डाव्या खांद्यावर जोरात मारून जखमी केले. मारहाण करत असताना व शिवीगाळ करत असताना ‘या लांड्याला मारून टाका, ‘उठाव दांडे भगाव लांडे’ अशा मोठमोठ्याने घोषणा देऊन शिवीगाळ करत मारहाण करत होते.
तेथे जमलेल्या लोकांनी मला दुसऱ्या बाजूला नेले आणि तेथील एका मोबाईल शॉपीमध्ये बसवून ठेवले. त्यानंतर पुन्हा तेथे अक्षय धुमाळ गोल्या ठाकूर व मिश्रा व इतर पाच सहा जणांनी येऊन मला शिवीगाळ करून मारहाण केली. काही वेळातच तेथे पोलीस आल्याने या मारहाण करणाऱ्या लोकांनी तिथून पळ काढला.
हुजेब शेख याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीं विरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. व गेल्या काही दिवसात घडलेल्या प्रकारांमुळे शहरात तणावाचे वातावरण असून कुठलीही घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


