शुक्रवार दि. ५ एप्रिल
लोकसभा निवडणुक प्रक्रिये दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी चार दिवस अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदार संघात चार दिवस कोरडा दिवस (ड्राय डे) पाळण्याचे आदेश दिले आहे.
मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजेच ११ ते १३ मे या कालावधीत व मतमोजणीच्या दिवशी ४ जूनला पूर्ण दिवस कोरडा पाळण्याचा आदेश लागू राहणार आहे. जिल्ह्याच्या सीमेसह लगतच्या इतर जिल्ह्यातील पाच किलोमीटर पर्यंतच्या क्षेत्रासाठी हे आदेश लागू राहतील.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (सी) अन्वये व मुंबई दारूबंदी कायदा, १९४९ चे कलम १४२ च्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश लागू केले आहे. दिंडोरी (नाशिक), नाशिक, भिवंडी (ठाणे) या लोकसभा मतदार संघात २० मे रोजी, बारामती (पुणे), उस्मानाबाद, माढा (सोलापूर) या लोकसभा मतदार संघात ७ मे रोजी मतदान असल्यामुळे या मतदार संघाच्या सीमेलगत अहमदनगर जिल्ह्यातील ५ किलोमीटर अंतरावर कोरडा दिवस लागू असेल. या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा व जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या ५ किलोमीटर अंतरावर सर्व प्रकाराच्या मद्य विक्रीची दुकाने (अनुज्ञप्त्या) बंद राहतील.
याशिवाय जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या जालना, औरंगाबाद, शिरूर (पुणे), बीड या लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी मतदान असल्याने या दिवशीही हे आदेश लागू असतील. त्यासाठी कोणतेही वेगळे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले नाहीत.
दारू विक्रेत्यांनी आपले दुकानातील (अनुज्ञप्त्या) देश व विदेशी, इतर अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यासाठी आदेशाप्रमाणे कालावधीत कार्यक्षेत्रातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, भरारी पथक क्र. १ व क्र. २ यांनी मद्याची विक्री, वाहतूक व दुकाने (अनुज्ञप्त्या) उघड्या राहणार नाहीत. याबाबत दक्षता घ्यावी. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीचा (दारू विक्री दुकान) दारू विक्रीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल. अशा सूचना ही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी आदेशात दिल्या.


