सोमवार दि. ८ एप्रिल, मुंबई
महाविकास आघाडीतील मित्र पक्षांबाबत जे बोलाल ते विचार करून बोला, मित्र पक्षातील नेत्यांची मन दुखावतील असं बोलू नये, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना दिला आहे.
थोरात म्हणाले, मित्र पक्षातील कार्यकर्त्यांबाबत राऊत ज्या पद्धतीने बोलत आहेत, ते योग्य नाही. त्यांनी विचारपूर्वक बोलायला हवं. आघाडीत एकत्र काम करायच आहे. त्यामुळे राऊतांनी काळजीपूर्वक बोलायला हवं.
सांगली, भिवंडी, मुंबईसह काही जागांसाठी आमचा आग्रह आजही काय आहे. त्यावर सकारात्मक चर्चा सुरू आहे, यासंदर्भात आजच निर्णय होईल. जागावाटपाच्या अंतिम निर्णयासाठी उद्या ९ एप्रिलला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी जागा वाटपा संदर्भात निर्णय जाहीर करेल.
काँग्रेस आग्रही मात्र ठाकरे व पवार गटाचे उमेदवार जाहीर…
महाविकास आघाडीत काही ठिकाणच्या जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. अशा स्थितीत या जागांवर महाविकास आघाडीत बिघाडी देखील झाल्याचे दिसते. सांगली भिवंडी मुंबईच्या जागे संदर्भात काँग्रेस आग्रही असले तरी या जागांवर ठाकरे गट आणि शरद पवार गट यांनी आपले उमेदवार यापूर्वीच जाहीर केले आहेत. यातूनच महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम नाराज असल्याने सांगलीवरून महाविकास आघाडीत तानातानी सुरू आहे.
दिल्लीत होणार निर्णय… सांगलीच्या जागेसंदर्भात दिल्लीमध्ये श्रेष्ठी एकत्र बसतील. या जागेसह भिवंडी आणि मुंबईच्या जागे संदर्भातही बैठकीत निर्णय घेतला जाईल. सांगलीच्या जागे संदर्भात मात्र आजच निर्णय होईल, असं थोरात यांनी सांगितल आहे.


