मंगळवार दि. ९ एप्रिल
पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या टाकीच्या स्फोटातील अपघात प्रकरणी मृत कामगारांच्या नातेवाईकांना साठ लाखापेक्षा अधिक तर जखमी कामगारांना प्रत्येकी अडीच ते पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने बजावले आहे.
राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील कुशाबापू रंगनाथ पवार व दादासाहेब कुशाबापू पवार यांनी विखे पाटील साखर कारखान्याने त्यांच्या शेतात परवानगी न घेता अवैधरित्या टाकलेल्या स्पेंट वॉशमुळे डाळिंब बागेला झालेल्या नुकसानी विरोधात महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कमिटी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व साखर आयुक्त यांच्या अल्प कारवाईमुळे पवार यांना न्यायासाठी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करावी लागली होती.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना प्रभावित क्षेत्रातील माती व भूगर्भातील पाण्याला झालेल्या नुकसानीचे अहवाल तसेच त्याची नुकसान भरपाई कशी करता येईल याचा अहवाल सादर करण्याचे फर्मावले होते. सुनावणी दरम्यान कुशाबापू रंगनाथ पवार व दादासाहेब कुशाबापू पवार यांच्या वकिलांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार, ६ एप्रिल २०१६ रोजी पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या आवारात झालेल्या टाकीच्या स्फोटातील अपघातामध्ये ३ बळी व १२ जणांना झालेली गंभीर दुखापत याकडे सहाय्यक संचालक औद्योगिक आरोग्य आणि सुरक्षा विभाग नगर यांनी केलेले तपासणीकडे लक्ष वेधले.
त्या अनुषंगाने सदर याचिकेमध्ये अंतिम निकाल सुनावताना विखे पाटील साखर कारखान्याच्या आवारात झालेल्या टँकर स्फोटांच्या अनुषंगाने प्रिन्सिपल बेंचने गठीत केलेल्या समितीचे अहवाल पाहता मयत झालेल्या ३ कामगारांच्या वारसांना ६० लाख रुपये रक्कम व इतर दुखापत झालेल्या कामगारांना प्रत्येकी अडीच ते पाच लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून तीन महिन्यांच्या आत अदा करण्याचे आदेश पारित केले आहेत.
ज्या दिवशी कारखान्यात टाकीचा स्फोट झाला होता त्यावेळी कामगारांचे मृतदेह जळत होते. दुसरीकडे कारखान्याचे चेअरमन राधाकृष्ण विखे व सुजय विखे हे शिर्डीमध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमात व्यग्र होते, असे पवार यांनी सांगितले असल्याचे दैनिक सामना ऑनलाईनने वृत्त दिले आहे.



