विश्लेषण | अनंत पांगारकर
शुक्रवार, दि. १२ एप्रिल
अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात मी आणि माझा पक्ष योग्य हे सांगताना समोरचा उमेदवार आणि त्याचा पक्ष किती वाईट यावर प्रचारातून टीकास्त्र सोडण्याचे काम सुरू आहे. मात्र वास्तवता या दोन्ही मतदारसंघात एकमेकांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपल्या विरोधातील पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर टीका करण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. ज्या पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर आपण टीका करतो त्याच घरात काही काळ आपण देखील सत्तेचा उपयोग घेतला, हे या मतदारसंघातील प्रमुख उमेदवार विसरले आहेत.
नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थितीतील प्रमुख चारही उमेदवारांना पक्ष बदलाचा दांडगा अनुभव आहे. ज्या पक्षातून आपण आता सत्तेसाठी दुसऱ्या पक्षात गेलो तोच मागच्या पक्ष किती वाईट हे सांगण्याची चढाओढ या उमेदवारांमध्ये सुरू आहे. वारंवार पक्ष बदलाच्या अनुभवानंतर आता विकासाच्या नावाखाली सत्तेची ऊब कायम ठेवण्यासाठी पुन्हा नव्याने येणाऱ्या सत्ताधारी पक्षात कोलांटउड्या मारणार नाही, याची हमी कोणताच उमेदवार देत नसताना आता माझा पक्ष किती श्रेष्ठ आणि मीच कसा योग्य हे मतदारांवर बिंबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज सकाळी एका पक्षात प्रवेश केलेला नेता उद्या लोकांसमोर दुसऱ्याच पक्षाची भूमिका मांडताना दिसतो, त्यामुळे हाच नेता परवा कोणत्या पक्षात असेल याची शाश्वती मतदारांना राहिलेली नाही. या सर्वांचे एक समान वैशिष्ट्य म्हणजे यांनी पक्ष बदलताच यांना नव्या पक्षाकडून उमेदवारी मिळाल्या. त्यांना मतदारांनी निवडूनही दिले.
या पार्श्वभूमीवर एकट्या नगर जिल्ह्यातील अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांवर नजर टाकली तरी त्यांचा पक्ष बदलाचा इतिहास समोर येतो. या सर्वांना वारंवार पक्ष बदलाचा मोठा इतिहास असल्याचे दिसते. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात महायुतीकडून डॉ. सुजय विखे (भाजप) आणि महाविकास आघाडीकडून निलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट) तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (शिवसेना एकनाथ शिंदे गट) तर महाविकास आघाडीकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) समोरासमोर एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकले आहेत.
- काँग्रेस-भाजपा असा प्रवास असलेले नगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे यांच्या कुटुंबीयांनी म्हणजेच बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे, शालिनीताई विखे यांनी काँग्रेस-शिवसेना-काँग्रेस-भाजपा असा दीर्घ पक्षीय प्रवास केला. या सर्वच पक्षात त्यांना मानाची स्थाने आणि पदे मिळाली.
- त्यांच्या विरोधातील उमेदवार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीकडून आमदारकी उपभोगली असली तरी तत्पूर्वी ते शिवसेना-राष्ट्रवादी-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) असा त्यांचा प्रवास राहिला.
- शिर्डी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार असलेल्या सदाशिव लोखंडे यांचा प्रवास देखील असाच रंजक आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडचे भाजपकडून आमदार असलेल्या लोखंडे यांनी भाजप-मनसे-शिवसेना आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे गट) असा राजकीय प्रवास केला.
- लोखंडेंचे प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले भाऊसाहेब वाकचौरे एकीकडे प्रशासकीय सेवेत होते. मतदार संघाच्या पुनर्रचनानंतर शिवसेनेने त्यांना या मतदारसंघातून संधी दिली आणि ते खासदार देखील झाले. शिवसेना काँग्रेस भाजपा आणि पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असा वाकचौरे यांचादेखील राजकीय प्रवास आहे.
त्यामुळे मतदारांना आपण सुज्ञपणे विचार करून ठरविण्याची वेळ आली आहे की आपण आपला लोकप्रतिनिधी निवडताना आपला लोकप्रतिनिधी त्याच्या सध्याच्या पक्षाशी एकनिष्ठ राहणार आहे का?


