सोमवार, दि. १५ एप्रिल
काही गट दबाव निर्माण करून, चुकीची माहिती पसरवून आणि सार्वजनिक अपमान करून न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. संकुचित राजकीय हितसंबंध आणि वैयक्तिक फायद्यासाठी प्रेरित होऊन काही घटक अशा प्रकारचे कृत्य करत आहे, यापासून न्यायव्यवस्था वाचविण्याची गरज असल्याच्या आशयाचे न्यायव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करणारे पत्र सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या समूहाने सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना लिहिले आहे.
सर्वोच्च न्यायालयातील चार आणि उच्च न्यायालयाच्या सतरा अशा २१ निवृत्त न्यायाधीशांच्या समूहाने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, न्यायव्यवस्थेवर येणारा दबाव थांबवायला हवा. न्यायव्यवस्थेला अवाजवी दबावापासून वाचविण्याची आवश्यकता आहे. राजकीय संबंध, वैयक्तिक फायद्यासाठी काही घटक न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास उडेल अशा प्रकारचे कृत्य करत आहे. न्यायालय आणि न्यायाधीशांच्या निष्ठेवर आरोप करून न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
'Need To Safeguard Judiciary From Unwarranted Pressures' : 21 Retired Judges Write To CJI DY Chandrachud | https://t.co/I4T70kVxgU
— Live Law (@LiveLawIndia) April 15, 2024
त्यांच्या अशा प्रकारच्या कृत्यामुळे न्यायव्यवस्थेच्या अखंडतेचा अवमान होत असून या समूहाकडून अवलंबलेली रणनीती भ्रामक आहे, त्याद्वारे ते न्यायव्यवस्थेची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही न्यायव्यवस्थेच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत आणि तिचा सन्मान निपक्षता जपण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहोत.
आम्हाला आशा आहे की, तुमचे मार्गदर्शन आणि नेतृत्व या आव्हानात्मक काळात न्याय आणि समानतेचा आधारस्तंभ म्हणून न्याय व्यवस्थेचे रक्षण करेल, असे देखील या पत्रात म्हटले आहे.


