शुक्रवार, दि.१९ एप्रिल
गोवंश जनावरांच्या हत्येसाठी प्रसिद्ध असलेल्या संगमनेरमधील कत्तलखान्यावर शुक्रवारी पहाटे नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून २९०० किलो गोवंश मांसासह २१ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या कारवाईत तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एलसीबीच्या कारवाईनंतर संगमनेरमधील कत्तलखाने केवळ कागदावर बंद असल्याचे समोर आले आहे. स्थानिक पोलिसांना हे कत्तलखाने बंद करण्यात पूर्णतः अपयश आले आहे.
नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संगमनेर मधील जमजम कॉलनीत सुरू असलेल्या कत्तलखान्यात गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार सचिन अडबल, बापूसाहेब फोलाने, गणेश भिंगारदे, सचिन लोंढे, अतुल लोटके, संतोष खैरे, रणजीत जाधव, रवींद्र घुंगासे, सागर ससाने, बाळासाहेब गुंजाळ, आकाश काळे, विशाल तनपुरे, उमाकांत गावडे आदींच्या पथकाने पहाटे जमजम कॉलनीत सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकला.


या कारवाईत पथकाने रेहान शेरखान पठाण (वय २१ वर्षे रा. रहेमत नगर, जोर्वे रोड, संगमनेर), सलमान हरून मनियार (वय ३४ वर्ष रा. मोमीनपुरा, छोटी मज्जिद जवळ, संगमनेर) आणि राझीक अब्दुल रज्जाक शेख (वय ३८ वर्ष रा. अलकानगर, दिल्ली नाका, संगमनेर) या तिघा संशयीतांना अटक केली आहे. तर प्रत्येकी सहा लाख रुपये किमतीच्या एम. एच. १७ बी.डी. ४१८२ व एम. एच. ११ ए.जे. ३२४६ या दोन पीकअप त्यामध्ये अनुक्रमे १५०० व १४०० किलो गोमांस, दोन हजार रुपये किमतीचा एक सत्तूर, दोन सुरे व एक कुऱ्हाड असा एकूण २० लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सचिन दत्तात्रय अडबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.


