शनिवार दि. २७ एप्रिल
सध्या देशात आणि राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. शिंदे-फडणवीस-पवार यांचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील, नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे, अशा ‘त्रास देणाऱ्यांची दुरुस्ती पुढील काळात होणार आहे’ असा सज्जड इशारा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
अकोले (अहमदनगर) येथे शुक्रवारी महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, कॉ. डॉ. अजित नवले, अमित भांगरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप वर्पे, संभाजी ब्रिगेडचे संदीप कडलग, काँग्रेस पक्षाचे शिवाजी नेहे, जगदीश चौधरी, राजू पाटील, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.
थोरात यांचे भाषण सुरु असतांनाच या सभेसाठी परवानगी आणि इतर गोष्टी मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खूप त्रास दिल्याची तक्रार करण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने बोलतांना थोरात म्हणाले, त्रास देणाऱ्यांची दुरुस्ती होणार आहे. ४ जूननंतर त्रास देणाऱ्यांच्या दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत. अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा आहे. भाजपला निवडून द्यायचं नाही, असा येथील जनतेचा निर्णय झाला आहे. भाजपची सत्ता ही लोकशाहीला आणि राज्यघटनेला घातक असल्याने भाजपविषयी शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या मनात आस्था राहिलेली नाही. कामगार, अल्पसंख्यांक यांच्याविषयी सत्ताधाऱ्यांना सहानुभूती नाही.
मणिपूरच्या अत्याचारावर देशाचे पंतप्रधान अवाक्षर हे बोलले नाहीत. साधी भेट देखील त्यांनी दिली नाही किंवा राष्ट्रपतींचा सन्मान केला जात नाही. अशा सत्ताधाऱ्यांना आदिवासीविषयी आस्था असणार नाही हे दिसून येते. हा देश हुकूमशाहीच्या वाटेने चालला असून राज्यघटना धोक्यात आली आहे. कोरियामधील हुकूमशहा किम जोंगच्या हुकूमशाहीत जनतेवर जे दिवस आले आहेत ते तुमच्यावर येऊ देऊ नका. त्यामुळे निवडणुकीत चांगला निर्णय घेणे हे तुमच्या हातात आहे.
महायुतीच्या निष्क्रिय उमेदवाराला आव्हान…
महाविकास आघाडीला राज्यात ४० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करीत ते म्हणाले की, विरोधी उमेदवार गेल्या दहा वर्षात कधीही मतदारसंघात फिरकला नाही. जनतेच्या संपर्कात आला नाही. फक्त निळवंडेच्या कामाचे श्रेय घेण्याचा उपद्व्याप ते करीत आहेत. एक रुपयाचा निधीदेखील त्यांनी आणला नाही. त्यांनी निधी आणला असेल तर तोंडी नाही तर पेपरवर दाखवा, असे आव्हानच थोरात यांनी विरोधी उमेदवाराला दिले.



