बुधवार दि.१ मे – संगमनेर
आता मनातील किंतु-परंतु नको, मी पालकमंत्री आहे माझ्या इभ्रतीचा प्रश्न आहे. उगीच लाईटली घेऊ नका, हसण्यावारी नेऊ नका, शंभर टक्के काम करून संगमनेरमधून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळालेच पाहिजेत. पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. गटातून मताधिक्य मिळणार नसेल तर उमेदवारी मागू नका असा थेट इशाराच राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला.
संगमनेरमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभासाठी मंत्री विखे बुधवारी आले होते. यावेळी ते बोलत होते. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
विखे म्हणाले, निवडणूक थोड्या दिवसांवर आली आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागण्याची गरज आहे. बूथ, गण आणि गटनिहाय नियोजन करून घरोघर पोहोचा. मतदार संघात काही मोठ्या नेत्यांच्या सभा होतील त्यासंबंधी काय नियोजन करायचे ते आम्ही करू. तुम्ही कामाचे गती वाढवा मतदारांपर्यंत पोहोचा. निळवंडे कालव्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी आले होते, त्यामुळे ज्या मतदारसंघात मोदी आले त्या मतदारसंघाचा खासदार हा महायुतीचाच झाला पाहिजे. ही आपल्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे या तालुक्यामधून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळायलाच हवे.
संघटितरित्या काम केल्यास आपण या मतदारसंघातून देखील महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य देऊ शकतो. आपल्यातील अंतर्गत मतभेद नंतर बघू. निवडणूक प्रचारादरम्यान गट, गाव सोडू नका. जबाबदारीने काम करा असे देखील ते म्हणाले.



