शनिवार, दि. ४ मे | अनंत पांगारकर
शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नऊ दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र प्रमुख उमेदवारांचा प्रचार अद्यापही थंडच आहे. अपवाद वगळता पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही निरुत्साह दिसत असून उमेदवारांच्या भूमिका मतदारांसह कार्यकर्त्यांना देखील संभ्रमात पाडणाऱ्या आहे. निवडून जाणारा आणि पराभूत होणारा उमेदवार आता तरी आहे त्या पक्षात एकनिष्ठ राहत दिल्या घरी सुखी राहणार की पुन्हा पदाच्या लालसेने पक्ष बदलणार याची गॅरंटी मात्र कोणीही देताना दिसत नाही.
आजी-माजी खासदारांसह या मतदारसंघात प्रथमताच प्रमुख महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. या महिला उमेदवारामुळे सुरुवातीची दुरंगी वाटणारी लढत आता तिरंगी बनली आहे. यामुळे सुरुवातीपासूनच विजयाच्या हवेत असलेल्या आजी-माजी खासदारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. प्रमुख उमेदवारांपैकी आजी-माजी खासदार असलेल्या उमेदवारांमागे राज्यातील बड्या नेत्यांचे पाठबळ आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांची मदार या नेत्यांवर आहे. तर या दोन्ही उमेदवारांची गणित बिघडवणारा तिसरा उमेदवार मात्र जनतेच्या म्हणजेच मतदारांच्या बळावर निवडणुकीला सामोरा जात असल्याचे दिसते.
आजी-माजी खासदारांना सुरुवातीला सोपा आणि एकतर्फी वाटणारा (दोघांनीही मतदारांना गृहीत धरल्याने) विजय तिसऱ्या उमेदवारामुळे कोणाच्या पारड्यात जातो याची उत्सुकता येथील मतदारांना लागली आहे. तीनही उमेदवारांना आपला विजय दृष्टिक्षेपात दिसत असल्याने आणि त्यांच्या वारंवार पक्ष बदलाच्या भूमिकेमुळे अद्यापही या मतदारसंघात मात्र पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह संचारल्याचे दिसत नाही.
मतदार संघातील समस्या, प्रश्न यावर कोणताही उमेदवार बोलत नसून केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप मात्र करत आहे. तसेच केवळ उमेदवारीसाठीच या तिन्ही उमेदवारांनी आपल्या मूळच्या पक्षाशी फारकती घेत नव्या पक्षाशी नवा घरोबा केल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी मात्र आहे तेथेच असून केवळ नाईलाजाने पक्ष बदलू उमेदवारांचा झेंडा हाती घेत त्यांच्या विजयासाठी या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना प्रयत्न करावे लागणार आहे.
या मतदारसंघात खासदारकीसाठी प्रथमतःच प्रमुख महिला उमेदवार मैदानात उतरल्याने दोघात तिसरा… अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या तिरंगी लढतीत महिला उमेदवाराने बाजी मारली तर या मतदारसंघाला पहिल्यांदाच महिला खासदार मिळू शकते. सध्या तरी कोणाचा कोणाला फायदा होणार आणि कोण कोणाचे नुकसान करणार हे अद्यापही अनुत्तरीत आहे.
अशी आहे उमेदवारांची पक्षीय एकनिष्ठता…
महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा पक्षीय प्रवास भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना आणि शिवसेना (शिंदे गट) असा राहिला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पक्षीय प्रवास शिवसेना, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, अपक्ष आणि आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असा राहिला आहे.
या दोन्ही उमेदवारांच्या तुलनेत तिसऱ्या वंचित बहुजन आघाडी कडून उभे असलेल्या महिला उमेदवार उत्कर्षा रुपवते यांचा राजकीय पक्षीय प्रवास काँग्रेस पाठोपाठ वंचित बहुजन आघाडी असा राहिला.
यामुळे निवडणुकीनंतर जर पुन्हा काही राजकीय उलथापालथ झाली तर कोण कुठे असेल याविषयी मात्र अनिश्चितता आहे.


