शुक्रवार, दि. १० मे
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी पुण्याच्या विशेष कोर्टाने पाच आरोपींपैकी दोघांना दोषी ठरवत सश्रम जन्मठेपेची शिक्षा दिली. तर उर्वरित तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे.
तब्बल ११ वर्षानंतर त्या प्रकरणाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी डॉ. दाभोळकरांची हत्या केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना दोषी ठरवत सश्रम जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर डॉ. वीरेंद्र तावडे, ॲड. संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता केली.
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणी पाच आरोपीविरोधात पुण्याच्या सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू झाली होती. त्यांच्या बदलीनंतर विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयासमोर हा खटला सुरू होता. सीबीआय तर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या घटनेत २० साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या. तर बचाव पक्षातर्फे ॲड. प्रकाश साळशिंगीकर, ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ॲड. सुवर्णा आव्हाड यांनी काम बघितले.
न्यायालयासमोरील सरकार आणि बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी दाभोळकरांची हत्या केल्याचे सिद्ध झाले. तर डॉ. वीरेंद्र तावडे, ॲड. पुनाळेकर आणि भावे यांच्यावर दाभोळकरांच्या हत्येचा कट कारस्थानाचा, शस्त्र नष्ट केल्याचा आरोप होता. तावडे, पुनाळेकर आणि भावे यांच्या विरोधात पुरावे सादर करण्यात सरकार पक्ष अपयशी ठरला. त्यामुळे सबळ पुराव्याअभावी तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
काय होती घटना…
- डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. देशभर खळबळ माजविणाऱ्या या घटनेत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अगदी जवळून त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. यातील एक गोळी दाभोळकरांच्या छातीत तर दुसरी डोक्यात लागली होती.
- दाभोळकरांच्या हत्येनंतर तब्बल दोन वर्षांनी सीबीआयकडून २०१६ मध्ये डॉ. वीरेंद्रसिंह तावडे या आरोपीला पनवेलमधून प्रथमता अटक करण्यात आली होती.
- त्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये महाराष्ट्र एटीएसकडून शरद कळसकर याला अटक करण्यात आली.
- मे २०१९ मध्ये व्यवसायाने वकील असलेल्या संजीव पुनाळेकर आणि त्याचा सहाय्यक विक्रम भावेला सीबीआयने अटक केली होती.
- सप्टेंबर २०२१ मध्ये न्यायालयाने दाभोळकर हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या विरोधात दोषारोप निश्चित केला.
- डॉ. दाभोळकरांच्या हत्येनंतर आठ वर्षांनी २०२१ मध्ये आरोपींविरोधात खटला सुरू झाला
- तर अकरा वर्षांनी १० मे २०२४ रोजी खटल्याचा निकाल देण्यात आला.


