शनिवार, दि. १८ मे
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी आठ दिवसानंतर राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
८ मे रोजी संजय राऊत यांनी नगरच्या जाहीर सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यामुळे राऊत यांच्याविरुद्ध अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार अतुल काजळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय होती घटना…
नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी ८ मे रोजी अहमदनगरमध्ये जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, दोन गुजराती लोकांना महाराष्ट्राबद्दल राग आहे. ते सुडाचं राजकारण करत आहेत. आपल्याला इतिहासामध्ये जावे लागेल. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. तेथील माती औरंगजेबाची माती आहे. त्या मातीतील हे दोन व्यापारी आहेत. औरंगजेबाचा जन्म आणि नरेंद्र मोदी यांचा जन्म दावतमध्ये झाला आहे. औरंगजेब तिथे जन्माला आला आहे. त्यामुळे आपल्याशी औरंगजेबाच्या वृत्तीने हे दोन व्यापारी वागत आहेत. एका औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडला आहे. तर तू कोण असा एकेरी उल्लेख संजय राऊत यांनी केला.


