मंगळवार, दि. २१ मे
संगमनेर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना ६० लाखाचा न वटणारा धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी संगमनेर न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब बन्सीलाल नाहटा यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयाने काढलेल्या या आदेशामुळे नाहटा यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.
नहाटा यांनी संगमनेरमधील दीपक काशिनाथ जाधव, मधुकर किसन ससाने, सुरेश संपतराव सावरे व भाऊसाहेब रामचंद्र वाघचौरे या चौघा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांकडून डाळिंबाची खरेदी केली होती. या बदल्यात त्यांनी दि. ५ एप्रिल २०२३ रोजीचा चौघांचा एकत्रित स्टेट बँक ऑफ इंडियाचा (शाखा लोणी व्यंकनाथ) ६० लाखाचा धनादेश दीपक काशिनाथ जाधव यांच्या नावाने दिला होता.
मात्र हा धनादेश न वटता परत आल्याने जाधव यांनी नहाटा यांच्याकडे पैशाची मागणी केली, मात्र यांनी पैसे न दिल्याने अखेरीस त्यांनी संगमनेर न्यायालयात न वटणारा धनादेश देत फसवणूक केल्याप्रकरणी ॲड. अनिल कासार यांच्या मार्फत जुलै २०२३ मध्ये खटला दाखल केला. न्यायाधीश गायकवाड यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे.
सुनावणी दरम्यान तारखांना न्यायालयात हजर न राहिल्याच्या कारणावरून जिल्हाध्यक्ष नहाटा यांना न्यायालयाने ९ मे अटक वॉरंट काढले आहे. या वॉरंटची बजावणी करण्याचे आदेश श्रीगोंदा पोलिसांना देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षांना न्यायालयाने काढलेल्या या अटक वॉरंटमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पुढील सुनावणीवेळी श्रीगोंदा पोलीस नहाटा यांना अटक करून न्यायालयात आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


