रविवार, दि. २६ मे | अनंत पांगारकर
खचल्यानंतर तब्बल दीड वर्ष नव्या निर्मितीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाजत गाजत केलेल्या भूमिपूजनानंतरही दीर्घकाळ रेंगाळलेला म्हाळुंगी नदीवरील पूल पाडण्यास अखेर मुहूर्त सापडला आहे. शनिवारपासून खचलेला पूल पूर्णतः नामशेष करण्यास सुरुवात झाली. यामुळे दीर्घकाळ गैरसोयीला सामोरे जाणाऱ्या संगमनेरकरांना नव्या पुलाच्या निर्मितीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान खचलेला हा पूल गेल्या दीड वर्षांपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद होता. पुलाचा विषय राजकीय श्रेयवादात अडकल्याने संगमनेरकर यातून भेटीला धरले गेले होते. यासाठी म्हाळुंगी पूल बनाव कृती समितीच्या माध्यमातून एकवटलेल्या संगमनेरकरांना अखेर न्याय मिळाला आहे. समितीच्या माध्यमातून सातत्याने करण्यात आलेल्या मागणीमुळे केवळ हाच पूल नव्हे तर शेजारील घोडेकर मळ्याकडे जाणारा पूल देखील पूर्णत्वास गेला आहे.
संगमनेरकरांची गरज लक्षात घेता म्हाळुंगी नदीवरील खचलेला हा पूल तातडीने दुरुस्त होईल ही अपेक्षा फोल ठरली होती. नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्यकर्त्यांच्या टोलवाटोलवीत गैरसोयीपेक्षा या पुलाचे राजकारणच मोठ्या प्रमाणात रंगल्याने पुलनिर्मितीचा प्रश्न गेले अनेक महिने अडगळीत पडला होता. आम्हीच कसे या पुलाचे निर्माते आहोत, आम्हालाच या प्रश्नाची तळमळ आहे यासाठी नेते मंडळींच्या पत्रांचा खेळ देखील कार्यकर्त्यांनी मांडला होता.
विरोधात असलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांनी पुलाच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत निधीची मागणी केली. पाठोपाठ लगेचच पालकमंत्र्यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र देत निधी मागितला. यात विद्यमान खासदारांनी मोठा पाठपुरावा केल्याचे भूमिपूजनाच्या भाषणातून संगमनेरकरांना सांगितले. वास्तविक पुलासाठी कोणताही नव्याने निधी मंजूर झाला नसून संगमनेर मध्ये सुरू असलेल्या एका कामाचा निधी पुलासाठी वळविण्यात आला. आणि लोकसभा निवडणूक आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची चिन्हे दिसतात थेट भूमिपूजनाचा देखील कार्यक्रम पार पडला.
मात्र निवडणुका उलटून गेल्यानंतर देखील पुलाच्या कामाला प्रत्यक्षात मुहूर्त सापडत नव्हता. दरम्यानच्या कालावधीत घोडेकर मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नदीपात्रात दुसऱ्या एका तात्पुरत्या पुलाची निर्मिती करण्यात आली यामुळे खचल्यामुळे बंद असलेल्या पुलावरील रहदारी बऱ्यापैकी या पुलावरून सुरू झाली. निवडणुका संपल्यानंतर पालिकेने लगेचच जुन्या पुलावरील शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन हलवत या पुलाच्या कामाला सुरुवात केली आहे. सध्या खचलेला पूल पाडण्याचे काम सुरू आहे.

खचल्यामुळे वाहतुकीस बंद झालेल्या पुलामुळे अनेकांची गैरसोय होत होती. वास्तविक पालिका पातळीवर असलेला हा विषय पालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय कारकीर्दीत अडकला. पुलासाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने हा विषय रेंगाळला. त्यामुळे म्हाळुंगी पूल बनाव कृती समितीच्या माध्यमातून जन आंदोलन उभे करावे लागले. राजकीय श्रेयवादाची देखील लढाई रंगली, मात्र वास्तविकता संगमनेरकरांना माहित आहे. पुलाच्या निर्मितीसाठी सातत्याने आंदोलने करावी लागली. यासाठी अनेकांनी सहकार्य केले. अखेर कामाला सुरुवात झाली हे समितीच्या आंदोलनाचे यश आहे. – किरण पाटणकर, म्हाळुंगी पूल बनाव कृती समिती.


