हिंदीमध्ये एक चांगली म्हण आहे, सौ चुवे खाके बिल्ली चली हज… या उक्तीला साजेसं वर्तन आपल्या देशाचे पंतप्रधान मोदींचं सुरू आहे. सारी पापं धुवून काढणारं ध्यान साधनेचं अध्यात्मिक तंत्र त्यांनी अंगिकारलं आहे. डोळ्यावर चष्मा आणि शेकडो कॅमेरामनच्या साक्षीने त्यांनी ध्यानाला सुरूवात केली आणि ४५ तासात ती संपलीही. या अध्यात्मिक तंत्राचा लोकांच्या मनावर बसेल असा उपयोग त्यांनी करून घेतला. लोकसभा निवडणुकीचा आपल्या सोयीचा सातवा टप्पा पार पडण्याआधी मोदी ध्यानसाधनेत मंत्रमुग्ध झाले. ‘नयनेन्ं यत्रम्ं…’ असल्या बेफिकीर आणि अश्लाघ्य अशा स्वत:च बनवलेल्या संस्कृत श्लोकाचा आधार घेत लोकांना वेडं बनवणार्या आपल्या पंतप्रधानाला सत्ता प्रचंड प्यारी आहे. सत्तेसाठी कोणताही मार्ग स्वीकारायला त्यांची तयारी आहे. कट कारस्थानांचा मार्ग अवलंबून सत्ता ताब्यात घेण्यासाठी केलेल्या पापांचा शाप ते घेत आहेत. निवडणुकीत शेवटच्या क्षणाला काहीही अडचण नको म्हणून हे महाशय ध्यानसाधनेचा मार्ग अवलंबतात. २०१९ च्या निवडणुकीपासून असंच घडत आहे. तेव्हा पुलवामाच्या घटनेचं पाप त्यांना धुवून काढायचं होतं.
ध्यानसाधनेला हिंदू धर्मात प्रचंड महत्व आहे. अशी ध्यानसाधना वाल्याने करून उपयोग नाही. त्यासाठी सहनशीलतेची जोड असावी लागते. वाल्याला तो अधिकार चोर्या चपाट्यांचा मार्ग सोडल्यावर प्राप्त झाला. मोदींनाही तो अधिकार जरूर आहे. पण त्यासाठी त्यांनी दिखावू नव्हे, प्रामाणिक सत्कर्म केलं पाहिजे. कट कारस्थान करून अशा ध्यानाला काही अर्थ नाही. जे मोदींनी गेल्या दहा वर्षात केले. साधनेला बसणार्याच्या ध्यानात व्यत्यय येऊ नये म्हणून प्रत्येकजण स्वत:ला सावरत असतो. ऋषी मुनींचं ध्यान असंच असायचं. अशावेळी झालेला व्यत्ययही अपशकुनी मानला जायचा. ध्यानाविषयी आत्मियतेने बोललं जायचं. मोदींच्या साधनेवर त्यांच्या भक्तांशिवाय कोणी आत्मियतेने बोलताना दिसत नाही.
सर्वसामान्य मोदींच्या ध्यानावर टीका करून तिची टर उडवत आहेत. इतरांचं ऐकण्याची पात्रताच जे हरवून बसतात त्यांना आपल्यावरील टीका ऐकू येत नसते. मोदीचं वर्तन असंच असल्याने त्यांना टीका होतेय, हे सांगायच्या भानगडीत कोणीही पडत नाहीत. आपल्या असल्या वागण्याचे परिणाम सामान्यांना होतात याचंही भान मोदींना नाही. ज्या विवेकानंद रॉक मेमोरियलचा वापर मोदींनी ध्यानासाठी करायला घेतला, ते स्मारक जागतिक ख्यातीचं आहे. जगभरातून येणार्या लाखो पर्यटकांचं ते श्रध्दास्थान होय. मोदींच्या ध्यानाकरिता पर्यटकांसाठी ते दोन दिवस बंद ठेवावं लागलं. आपल्या ध्यानाने सामान्यांच्या गरजा रोखल्या जात असतील तर अशा ध्यानाला हिंदू संस्कृतीत स्थान नाही. हेच उद्योग मोदींनी प्रचारादरम्यान केलं. मुंबईसह विविध राज्यांमध्ये केलेल्या रोडशोतून त्यांनी सामान्यांचा मार्ग रोखला. हातावर पोट असलेल्यांनी मोदींच्या नावाने बोटं मोडली.
गैरमार्गाचा अवलंब करून नंतर ध्यानाला बसलं की पापं धुतली जातात असं समजणार्यांची संख्या हिंदू धर्मात कमी नाही. ध्यानाला बसणार्याला तसं वाटतच, पण त्याहून इतरांनीही तो मान्य करावा असा हट्ट काहींचा असतो. मोदींचाही तसा हटवाद आहे. देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी देशातील जनतेच्या पुढे मांडलेले विचार, तोडफोडीचं केलेलं राजकारण, विरोधकांना दिलेल्या धमक्या, त्यांच्यावर केलेल्या कारवाया, व्यक्तीगत शेरेबाजी या पापातून मोक्ष मिळावा, असं मोदींना वाटत असावं. सारे मार्ग संपल्यावर मोदींनी ध्यानाचा वापर करायला घेतला असल्यास नवल नाही. माणसं किती बनेल असतात हे मोदींकडून शिकावं.
आपल्याशी स्पर्धा करू पाहणार्या आपल्याच पक्षाच्या नेत्यांसाठी ७५ वर्षांची मर्यादा घालणार्या मोदींनी स्वत:वर ही वेळ येताच पळ काढला. मातेच्या उदरी जन्म हे निमित्त होतं, असं ते सांगू लागले. आपल्या जन्मात जीवशास्त्र हे निमित्तमात्र होतं, असं ते ठोकून देत होते. परमेश्वराने आपल्याला चांगलं घडवण्यासाठी सृष्टीत पाठवल्याचा सूर त्यांनी आळवला आणि स्वत:ची तुलना देवाशी केली. बुध्दूंच्या गोताळ्यात असं केलं की वेळ, काळ आणि मर्यादा गळून पडतात. ज्या वयाच्या मर्यादा आपण सहकार्यांना घातल्या त्यातून स्वत:ची सुटका करण्यासाठी त्यांनी परमेश्वरी अवताराचं कारण पुढे केलं. असा खोटेपणा जपल्यावर ध्यानातून सुटका वैगेरे सब झुट. हे जसं भक्तांना सांगण्याची सोय नाही, तसं अशिक्षितांनाही सांगून त्याचा काही उपयोग नाही. मोदींच्या राजवटीने देशाची शिक्षण व्यवस्था बोथट का ठेवली, याचं हे उत्तम उदाहरण होय. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, असं धुरंधर म्हणायचे. अशी वाघीण मोदींसारख्याना कदापि स्वीकारार्ह नसते. तेव्हा ते अशा ध्यानाचं निमित्त करतात. या लबाड्या अज्ञानांपुढे सहज खपून जातात. ध्यानातून मोदीना हेच साध्य करायचं आहे.
सत्ता मिळावी म्हणून ज्या निवडणुकीच्या प्रचाराचा आसरा त्यांनी घेतला त्या प्रचारात मोदींनी सार्या मर्यादा ओलांडल्या. सत्तेत अडसर ठरू पाहणार्या राज्यांच्या निवडणुका त्यांनी सात टप्प्यात घेतल्या. तर आपल्या हाती असलेल्या गुजरातसारख्या राज्यात मात्र एका टप्प्यात निवडणूक संपवली. आजवर असा पळपुटेपणा एकाही पंतप्रधानाला करावा लागला नाही. एकेका राज्यात दोन वा तीन सभा झाल्या की नेत्याला त्या पुरेशा वाटत. मोदींनी या निवडणुकीत चक्क १८० सभा घेतल्या. त्यांची भलामण करणार्यांना तो विक्रम वाटत असला तरी तो संसदीय लोकशाहीचा अतिरेक होता, याची जाण त्यांना नाही. मोदींचा हा सारा खर्च आयोग लोकांच्या माथी मारेल.
ज्या मेमोरियलचा वापर मोदींनी ध्यानासाठी करून घेतला ते स्वामी विवेकानंद यांचं श्रध्देय स्थान. स्वामींच्या विचारांची इतकीही सर नसलेल्या व्यक्तीने स्वामींच्या नावाने साधनेचं निमित्त करावं याचं आश्चर्य आहे. देवाच्या नावाने राजकारण करण्यासाठी देशात अनेक मंदिरं आणि आश्रमं आहेत. यासाठी स्वामी विवेकानंदांच्या आश्रमाची निवड करून मोदी अगदी खालचं राजकारण करत आहेत. शेवटच्या सातव्या टप्प्यातील ५७ जागांच्या मतदानापैकी १७ जागा आंध्रप्रदेश आणि ९ जागा या प. बंगाल राज्यातील आहेत. ज्या जागांवर भाजपला कधीच यश आलं नाही. यश मिळावं म्हणून मोदींनी स्वामी विवेकानंद यांच्या प. बंगालशी असलेल्या भावनिक नात्याचा राजकीय फायदा घेतला.
ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडूनही उपयोग होत नाही, हे लक्षात आल्यावर मोदींनी सुभाषचंद्र बोस यांच्या घरापासून विवेकानंदांच्या स्मारकापर्यंत रोडशो करून घेतला. आंध्रप्रदेश आणि प. बंगाल या राज्यांमध्ये देवाला मानणारा मोठा वर्ग आहे. ध्यानाचं निमित्त केलं तर देवभोळ्या लोकांना आपलंसं करता येईल, हे मोदींनी ताडलं. ध्यानाचं निमित्त करायचं आणि हिंदूंची मतं आपल्याकडे खेचायची हा खेळ यामागे लपला आहे. एकेका जागेसाठी राजकीय पक्षांचं अस्तित्व रोखणार्या भाजपला मतांसाठी कोणत्या थराला यावं लागतं याचं मोदींचं हे ध्यान होय.
दुर्देवं वाटतं ते देशाच्या निवडणूक आयोगाचं. देशातल्या सार्या यंत्रणा या भाजपच्या दावणीला बांधलेल्या आहेत, या विरोधी पक्षांच्या आरोपाला पुष्टी देणार्या घटना अनेकदा घडूनही आयोगाने त्याची जराही दखल घेतली नाही. निवडणूक संहितेत धार्मिक प्रचाराला स्थान नाही. याविरोधी विरोधकांनी लेखी तक्रारी करूनही आयोगाने त्याची दखल घेतली नाही. आता ज्या पध्दतीने भाजपने मोदींच्या ध्यानाचं राजकारण केलं गेलं ते पाहाता आयोग जागं होईल, असं वाटत असताना तिथेही मौन साजरा होतो आहे. ध्यान हे निमित्त आणि मतदारांचं ध्यान खेचणं हा त्यामागचा कुटील हेतू निवडणूक आयोगाला कळू नये? चारशे पारचा नारा देणार्या भाजपचा अंतस्थ हेतू हा संविधान बदलाचा होता, हे लपून राहिलेलं नाही. मोहन भागवतांपासून अनंत हेगडेंपर्यंतच्या नेत्यांच्या वक्तव्याचा जाब विचारण्याऐवजी विरोधकांना नोटीसा काढणार्या आयोगाकडून काहीच अपेक्षा नाहीत.
प्रचारात महिलांचं मंगळसूत्र, मुस्लिमांचं आरक्षण, अदानी-अंबानींचा काळा पैसा वाटता-वाटता मोदींनी पवारांच्या भटकत्या आत्म्याला घातलेली साद, उध्दव ठाकरेंमधील नकली संतानाला दिलेलं निमंत्रण. राहूल गांधींमधील शहेजाद्याची आठवण मोदींना झोपू देत नसेल. याच्या पापक्षालनासाठी ध्यानाचा हा नाटकीपणा त्यांनी केलेला दिसतो आहे.
प्रवीण पुरो
(संपर्कासाठी मोबाईल क्रमांक : ८१६९१३५२५३)
लेखक मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार आहेत.


