सोमवार, दि. ३ जून
मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून दोन दिवसांसाठी व्हाट्सअप ग्रुपचे सेटिंग ‘Only admin’ करण्याची नोटीस पोलीस प्रशासनाने काढली असून व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास संबंधित ग्रुपच्या ॲडमिनवर देखील कारवाई केली जाणार आहे. भारतीय दंड विधान संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई होऊ शकते, असा इशारा संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसात व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून राजकीय पक्षाच्या नेत्यांवर विविध प्रकारे खालच्या पातळीवर टीकाटिप्पणी सुरू आहे. संगमनेरमध्येदेखील अशा टीकाटिप्पणीतून वाद उद्भवल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती, या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या या नोटीसला महत्त्व प्राप्त झाले आहे.
मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. त्यादिवशी निकाल जाहीर झाल्यावर ग्रुप ॲडमिनसह कोणीही सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप अथवा इतर माध्यमातून कोणत्याही समाजाच्या, जाती धर्माच्या भावना दुखावतील अशा वादग्रस्त पोस्ट, कमेंट, स्टोरी, स्टेटस, फोटो, व्हिडिओ डिजिटल बॅनर ग्रुपवर प्रसारित करणार नाही. प्रसारित केल्यास आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास संबंधित ग्रुपच्या ॲडमिनवर देखील कारवाई होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये, डीजे वाजणार नाही, फटाके फोडले जाणार नाही, विनापरवाना विजयी मिरवणूक निघणार नाही, याची सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे. व्हाट्सअप ग्रुप ॲडमिनने निकाल जाहीर होईपर्यंत ग्रुपचे सेटिंग Only admin करून घ्यावे, त्यामुळे ग्रुप सदस्य अथवा ॲडमिनवर कारवाई होणार नाही, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ॲडमिनने ग्रुप सेटिंगमध्ये बदल न केल्यास आणि कोणत्या ग्रुप वर वादग्रस्त पोस्ट टाकल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे, असे पोलीस निरीक्षक मथुरे यांनी म्हटले आहे.
ॲडमिन, सदस्यांवर या कलमांतर्गत होऊ शकते कारवाई…
सोशल मीडियावरील एखादा पोस्ट मधून कोणाचे चारित्र्य हनन झाल्यास, कोणाचा अवमान झाल्यास किंवा त्या पोस्टमधून जातीय तेढ निर्माण होऊन काही अनुचित प्रकार घडल्यास अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, कोणाचा खून किंवा जबर हाणामारी झाली तर निश्चितपणे ग्रुपमधील सदस्यासह ग्रुप ॲडमिनलाही जबाबदार धरले जाते. त्यांच्यावर आयपीसी कलम ३४ प्रमाणे, कलम १५३ प्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाते. सोशल मीडियातून कोणी कोणाला शिवीगाळ केली किंवा धमकी दिल्यास कलम ५०४ व ५०६ प्रमाणेदेखील कारवाई होते. या कलमांतर्गत संबंधितास ६ महिने ते ३ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते, असे सायबर पोलिसांनी म्हटले आहे.
मंगळवारी लोकसभा निवडणुकीचे मतमोजणी होत असून निवडणुकीचे निकाल समोर येत असल्याने यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ३ जून ते ५ जून या कालावधीत ग्रुपचे सेटिंग Message send only from admin असे करून घ्यावे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप सदस्यासह ॲडमिनलाही जबाबदार धरून कारवाई केली जाईल. – भगवान मथुरे, पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर पोलीस ठाणे.

