मंगळवार दिनांक ४ जून
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. आतापर्यंत राज्यातील ४८ पैकी ३१ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आपल्या प्रतिस्पर्धी महायुतीच्या उमेदवारांपेक्षा पुढे आहे. तर सत्ताधारी महायुतीने १६ जागांवर आघाडी घेतली आहे. १ जागेवर काँग्रेस पुढे आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच राज्यातील मुंबई, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागातून महाविकास आघाडीला मोठे यश मिळवताना दिसत आहे.
काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. हजार पाचशे मतांच्या फरकाने काही ठिकाणी उमेदवार झुंज देत असून काही ठिकाणी ५० हजाराच्या पुढे मताधिक्य मिळाले आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या जागांमध्ये मोठी वाढ होताना दिसत असतानाच दुसरीकडे महायुतीतील मित्र पक्षांच्या जागा मात्र मोठ्या संख्येने घटल्या आहेत. गेल्या निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांनी ४८ पैकी ४२ जागा मिळविल्या होत्या. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे या निवडणुकीतील चित्र पूर्णतः बदलले आहे.
या निवडणूक निकालानंतर राज्यात खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणाची याचा देखील मतदारांनी केलेला फैसला समोर येणार आहे. निवडणुकीत महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीची मोठी पीछेहाट होताना दिसत आहे.
आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीने ३१ जागांवर आघाडी घेतली असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वाधिक १२, काँग्रेसला ११ तर राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार) ८ जागांवर मोठी आघाडी मिळाली आहे. याउलट भाजपने सर्वाधिक ११, शिवसेनेने (शिंदे) ६ व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) १ जागेवर पुढे आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात दहा जागा लढविल्या त्यापैकी आठ जागांवर त्यांचे उमेदवार पुढे आहेत.


