सोमवार दि. १० जून २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी स्थानापन्न झालेल्या तिसऱ्या ‘रालोआ’ सरकारमध्ये महाराष्ट्राला उत्तरप्रदेश, बिहार पाठोपाठ संधी मिळाली आहे. मोंदीच्या नव्या मंत्रीमंडळाता सर्वाधिक नऊ मंत्री उत्तरप्रदेशमधील असून त्यापाठोपाठ बिहारमधूून आठ व महाराष्ट्रातून सहा जणांना संधी देण्यात आली आहे. यात भाजपचे चौघे तर मित्रपक्षाच्या दोघांचा समावेश आहे.
मोंदींच्या नव्या मंत्रीमंडळात शपथ घेणाऱ्यात भाजपकडून पीयुष गोयल, नितीन गडकरी, रक्षा खडसे व मुरलीधर मोहोळ, शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव व आरपीआय (आठवले) कडून रामदास आठवले यांचा समावेश आहे.
भाजपाचे जेष्ठ नेते नागपुरचे खासदारर नितीन गडकरी, उत्तर मुंबईतून निवडून आलेले खासदार पीयुष गोयल या दोघांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. तर बुलढाणा लोकसभा मतदार संघातून सलग तीन वेळा निवडून आलेले शिंदे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार, रावेर मतदार संघातून निवडून आलेल्या रक्षा खडसे यांच्यासह पुण्यातून प्रथमच खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ या दोघा भाजपच्या खासदारांसह आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीदेखील राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.


