मंगळवार, ११ जून २०२४
पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरिपाच्या पेरणीला लागला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा करा तसेच बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सर्व विभागीय आयुक्तांना दिले.
सोमवारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीसाठी महसूल, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पवार यांनी पहिल्याच पावसात पुण्यात उद्भवलेल्या परिस्थितीची दखल घेत महापालिकेने याबाबत त्वरित आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
राज्यात काही भागात १०० मिलिमीटर अथवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडला आहे. अशा परिस्थितीत वापसा आल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरण्याचे नियोजन करावे यासाठी, कृषी विभागाच्या समन्वयाने जनजागृती केली जावी असे देखील ते म्हणाले.
धरणातील पाणी सोडण्यासाठी काटेकोर नियोजन करावे. धरणांवर जलसंपदा विभागाने आपला समन्वय अधिकारी नियुक्त करावा. त्याच्या माध्यमातून योग्य वेळी पाण्याच्या विसर्गाबाबत नियोजन करावे असे देखील निर्देश पवार यांनी यावेळी दिले.


