
एखाद्याला अहंकार जडला की तो कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. अशा व्यक्तीला ‘ग’ची बाधा झाली असं म्हणतात. सत्ताधारी भाजपच्या अनेकांना या बाधेने पछाडल्याने त्यांचे कान उपटून काहीही साध्य होणार नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार बसलं खरं. पण त्याने मोदी आणि त्यांच्या पिळावलीशिवाय कोणीही समाधानी नाही, हेच आता सिध्द होतय. संघाचं मुखपत्र म्हणून ज्याची पूर्वांपार ओळख आहे त्या ‘ऑर्गनायझर’ या नियतकालिकाने मोदी आणि त्यांच्या वाचाळ नेत्यांचे ओढलेले कान हेच सांगताहेत. त्याआधी संघ सरसंचालक मोहन भागवत यांनी मोदी आणि त्यांच्या सत्ता परिवाराला असाच कानमंत्र दिला आणि असं वागणं नियतीला मान्य नाही, असं सांगून टाकलं. संघात सुरू असलेल्या खदखदीवरून मोदी आणि शहा या जोडीच्या वर्तणुकीवर किती नाराजी आहे, हे कळून चुकतं.
‘अबकी बार चारसौ पार’चा नारा देताना आपण वाहवत चाललोय, याची जाणीव या जोडगोळीला नव्हती. लोकांच्या डोक्यात भरलं की त्यांचा मेंदू तसंच काम करत असतो, अशा स्वप्नात ही जोडी होती. जोडगोळीच्या या वायफळ घोषणेचा लोकांनाही उबग आला होता. त्यात अनंतकुमार हेगडे, अरुण गोवील यांच्यारख्या वाचाळांनी तर संविधान बदलाची घोषणा करून आगीत तेल ओतलं. याचे परिणाम व्हायचे ते झाले. लोकांची मानसिकता त्यांनी लक्षात न घेता त्यांना गृहित धरलं, तेव्हाच सारं स्पष्ट झालं होतं. संविधान बदलाच्या घोषणा होऊ लागल्यापासून लोकं संतप्त होते. ते केवळ बोलून दाखवत नव्हते. मनुस्मृतीचा उघड जप करणारे लोकांच्या डोक्यात गेले होते. लोकांनी धडा दिला तरी जोडीचा माज काही कमी झालेला नाही. हेच ‘ऑर्गनायझर’ने दाखवून दिलंय.

भाजपच्या वाचाळांनी मतदारांना गृहित धरलंच होतं. ते काय आपलं करणार, असा प्रश्न त्यांना पडला असावा. याआधी चुकीचे कसेही निर्णय घेतले तरी आपलं वाकडं झालं नाही, ते आता काय करणार, असं त्यांना वाटलं असावं. त्यांनी जसं मतदारांना गृहित धरलं तसं आपल्याला ज्या संघाने घडवलं त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही त्यांनी जुमानलं नाही. हवा इतकी डोक्यात गेली की यापुढे संघाचं ऐकण्याची सक्ती राहणार नाही, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा बोलून गेले. संघाला भाजपच्या नेत्यांप्रती काय आदर आहे, हे यावरून स्पष्ट दिसतं. आपल्या मातृसंस्थेविषयी असे विचार असणार्यांकडून काय अपेक्षा कराव्यात? लोकसभेच्या निकालाने भाजप नेत्यांच्या विशेषत: खोटारडेपणाचे इमले रचणार्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पुरता हिरमोड झाला. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या मदतीने सरकार चालवण्याची आफत त्यांच्यावर येऊन पडली.
ज्या चंद्राबाबू आणि नितीश यांची मदत घेतली जाते आहे, त्यांच्याविषयी या जोडगोळीने याआधी केलेली वक्तव्यें पाहिली तर लाज असलेला कोणीही माणूस या जोडगोळीच्या जवळ जाणार नाही. भर सभांमध्ये लाज लज्जा काढूनही जी माणसं सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसतात तेव्हा त्यांचा हेतू प्रामाणिक असेल, यावर ‘ऑर्गनायझर’चाच काय कोणाचाच विश्वास नाही. यामुळेच आता तरी जमिनीवर या, असा रट्टा या नियतकालिकाने लगावला आहे. रंगवलेली स्वप्न अतिआत्मविश्वासाने खड्डयात जात असतात, याची जाणीव संघाने मोदी-शहा या मंडळींना करून दिली आहे. पण मोदी स्वत:लाच देवाचा अवतार समजू लागल्याने संघानेच काय कोणीही बोललेलं त्यांच्या कानापर्यंत पोहचत नाही. मोदींनी स्वत:च देवत्व बहाल केल्याने त्यांचे भक्त मोदीमंदिरं उभारण्याच्या नादाला लागले आहेत. येऊ घातलेली पंचाहत्तरी अडचणी ठरू लागते हे लक्षात आल्यावर त्यांनी देवत्वाचा आधार घेतला आणि खोटेपणाचा कळस केला. इतकं खोटारडेपण करूनही जी व्यक्ती स्वत:ला सावरत नाही ती संघाला जुमानेल, यावर कोणाचा विश्वास नाही.
माज इतक्या पराकोटीला गेला होता की मोदी, शहांपासून फडणवीस, शेलारांपर्यंत कोणीच संघाला विचारत नव्हतं. नेतेच संघाप्रती इतके बेफिकीर बनल्याने पक्षाचे कार्यकर्तेही वाह्यात वागू लागले. खोट्या घोषणांनी त्यांचं मस्तक बधीर केलं. मोदी, शहा, नड्डा सांगतील तीच पूर्वदिशा मानू लागले. त्यांनाही संघाची गरज उरली नव्हती. निवडणुका जाहीर झाल्यापासून या मंडळींनी संघाला जराही विश्वासात घेतलं नाही, असं ‘ऑर्गनायझर’ला सांगायचंय. नेते बिझी असतील, असं मानून संघाच्या धुरीणांनी स्वत:च त्यांना गाठण्याचा, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण एकानेही त्यांना दाद दिली नाही. सत्ता डोक्यात गेल्यावर जे घडतं तेच संघाच्याबाबतही घडत होतं. सोशल मिडियावर पोस्टर्स आणि सेल्फी शेअर करून ध्येय साध्य होत नाही, याचं साधं अकलन ज्यांना नाही त्यांना आणखी काय सांगावं, असा सवाल करत ‘ऑर्गनायझर’ने संघाची हतबलता उघड केली.
सत्तेसाठी महाराष्ट्रात केलेली तोडफोड संघालाही रुचलेली नाही, हे ‘ऑर्गनायझर’ने स्पष्टच सांगून टाकलं. लोकशाही मार्गाने जे करता येईल, ते गृहित धरलं जातं. पण ज्याला लोकशाहीचा आधारच नाही, अशी तोडफोड करून सत्ता मिळवण्याचे विपरित परिणाम हा निसर्ग नियम असल्याचं या नियतकालिकाने स्पष्टच सांगितलं. असली हेराफेरी लोकं मनात ठेवतात, हे महाराष्ट्राच्या निकालाने दाखवून दिलं. सत्ता असूनही अजित पवारांना जवळ करण्याचं कारण तोडफोड करणार्या देवेंद्र फडणवीस यांनीही संघाला सांगितलं नाही, हे आणखी एक सत्य बाहेर आलं. यावरून इतर वेळा छातीचा कोट करून संघाचं कौतुक करणारे देवेंद्र फडणवीसही आपमतलबी निघाले, असा याचा अर्थ. हे करून भाजपने आपली ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’ कमी केल्याचं नियतकालिकातील लेखात नमूद आहे.
या लेखात ज्यांनी हे घडवून आणलं त्या देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं नसलं तरी सारा रोष हा फडणवीस यांच्यावरच टाकण्यात आला आहे. इतक्या टोकाच्या राजकारणाने सारा घात झाला आणि कधी नव्हे इतकी मानहानी महाराष्ट्रात वाट्याला आल्याचं सांगण्यात आलं आहे. एकट्या ‘ऑर्गनायझर’ने हे म्हटलंय असं नाही. तर संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनीही सत्तेचे कान उपटले आहेत. नागपूरमध्ये संघाच्या कार्यकर्ता विकास प्रकल्प कार्यक्रमात बोलताना त्यांनी निवडणुका म्हणजे युध्द नाही, याची जाणीव मोदी, शहांना करून दिली आहे. या दोघांनी आपल्या विरोधकांची नको नको त्या शेलक्या शब्दात संभवना केलीच. त्यांच्याविषयी लोकांमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न केला. कोणाला भटकता आत्मा, तर कोणाला नकली संतान म्हणून हिणवलं. आपल्या समोर विरोधकांचा अंशच शिल्लक नको, अशा प्रकारे मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्नही भागवतांना रुचला नाही.
लोकशाहीने प्रतिपक्षाला तितकंच महत्व दिलंय जितकं ते सत्ताधारी पक्षाला असतं. पण याच प्रतिपक्षाचं जिणं हैराण होणार असेल, तर तो कारभार लोकशाहीला पारखा आहे, असं भागवत म्हणतात. ऐन निवडणुकीत काँग्रेससारख्या एका राष्ट्रीय पक्षाची खाती गोठवणं, विरोधकांच्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना ऐन प्रचारातून अटक करणं, या गोष्टीही भागवतांनाही मानवल्या नाहीत.

विकासाचे मापदंड ठरवण्याचा सल्ला त्यांनी भाजपला दिला आहे. मणिपूर वर्षभरापासून जळतो आहे. त्याच्याकडे पाहण्याची गरज सत्तेला नसेल तर ते अतिगंभीर होय, अशी शेरेबाजी करताना भागवतांनी भाजप आणि मोदी-शहांना घरचा आहेर दिला आहे. दोन्हीकडील गटांना आपापली बाजू मांडण्याचं ते व्यासपीठ, ही संसदेची व्याख्या सांगताना भागवत यांनी तिथे एककल्ली कारभार चालणार असेल ते व्यवस्थेला अभिप्रेत नाही, असे खडेबोलही सुनावले. आपल्याच भावंडांना तुच्छतेने वागवलं, त्यांना हिडीस वागणूक दिली तर त्यांना देशाविषयी आत्मियता कशी वाटेल, असं विचारत भागवत यांनी भाजपच्या धार्मिक आणि जातीय राजकारणावर कोरडं ओढलं. पण याचा मोदी-शहांवर परिणाम होईल, असं मानण्याची आवश्यकता नाही, इतका अहंकार त्यांना जडला आहे. तेव्हा संघाने सांगितलं आणि जोडगोळीने ऐकलं असं होणं नाही.
(लेखकाच्या संपर्क क्रमांक – ८१६९१३५२५३)

