सोमवार दिनांक १७ जून २०२४
शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्यानंतर कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. जिल्ह्यात अचानक करण्यात आलेल्या तपासणींमध्ये बारा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. ३० पेक्षा अधिक कृषी सेवा केंद्रांना नोटीस बजावण्यात आल्या तर तीन ठिकाणी थेट गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर आली.

यंदा सर्वत्र चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग बियाणे खते आणि कीटकनाशकांचा काळाबाजार रोखण्यासाठी ॲक्शन मोडवर आले आहे. बाजारपेठेत कपाशी सोयाबीन कडधान्य पिकाच्या बियाण्यांना मोठी मागणी असून बियाण्यांचा काळाबाजार, चढ्या दराने विक्रीच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने अचानक भेटीद्वारे कृषी विभागाने कृषी केंद्रांची तपासणी करत कारवाई सत्र सुरू केले आहे.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बाजारात बियाणे खतांची टंचाई भासणार नाही काळाबाजार होणार नाही लिंकिंग होणार नाही याची दक्षता घेण्याच्या आदेश कृषी विभागाला दिल्यानंतर जिल्हा पातळीवरून स्वतंत्र आणि तालुका पातळीवर चौदा अशा एकूण पंधरा पथकांद्वारे कृषी केंद्राची तपासणी केली जात आहे. विक्रीसाठी येणारे बियाणे, विक्री झालेले बियाणे, शिल्लक साठ्याची बॅच नंबरसह तपासणी केली जात आहे. माहिती अद्यावत न ठेवणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येत आहे.
नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात ३१३ बियाण्यांचे नमुने, १३९ खतांचे नमुने आणि ६२ खतांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. नेवासा येथे तिघात विरोधात कपाशी बियाणांचा काळाबाजार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनियमितता असलेल्या सहा बियाणे विक्री केंद्रांचे परवाने, खतांचे तीन आणि कीटकनाशकांचे तीन अशा बारा कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले. ३० पेक्षा अधिक जणांना नोटीस बजावण्यात आले असून त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा न आल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे गुण नियंत्रक ए. एस. ढगे यांनी सांगितले.

येथे केली कारवाई…
दरम्यान काळाबाजार करणे साडेदहाराने बियाण्यांची विक्री करणे आणि रेकॉर्ड ठेवण्यात अनियमित्ता ठेवणाऱ्या जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, राहुरी, नेवासा येथे प्राधान्याने कारवाया करण्यात आले आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये तपासणी सुरू असून तेथील अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

