मंगळवार, १८ जून २०२४
शुक्रवारी (१४ जून) रात्री संगमनेर शहरालगत असलेल्या नाशिक पुणे बाह्यवळण मार्गावरील कासारवाडी गावच्या शिवारात एका महिलेचा संशयस्पदरित्या मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटविण्यापाठोपाठ खून प्रकरण समोर आणण्यात संगमनेर पोलिसांना यश आले आहे. या विवाहितेचा काटा तिच्या प्रियकरानेच काढल्याचे समोर आले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बाळासाहेब बिरू हळणर (रा. आंभोरे ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव असून त्याला ताब्यात घेतल्यानंतर या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.
रंजना शिवाजी खेमनर (वय ३५ वर्ष, रा. अंभोरे तालुका संगमनेर) ही विवाहिता आपल्या सासूसोबत शुक्रवारी संगमनेरमधील रुग्णालयात सासूच्या डोळ्याच्या उपचारासाठी आली होती. सायंकाळी डबा आणण्याच्या निमित्ताने ती बाहेर गेली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत ती रुग्णालयात परतली नव्हती. दरम्यान संगमनेर पोलिसांना बाह्यवळण मार्गावर कासारवाडी गावच्या शिवारात एका महिलेच्या संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह रंजना खेमनर ही जात असल्याचे समोर आले. ती तिकडे का व कशासाठी गेली, तिचा अपघात झाला की घातपात हे कोडे सर्वांनाच पडले होते.
दरम्यान शहर पोलिसांनी या संदर्भात सुरुवातीला अकस्मात व नंतर अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गावातीलच बाळासाहेब बिरू हळणर याला ताब्यात घेतल्यावर या खून प्रकरणाचा उलगडा झाला.
मृत विवाहिता रंजना शिवाजी खेमनर आणि बाळासाहेब बिरू हळणर यांच्यात विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. मी यातून बाळासाहेब तिच्या मागण्या पूर्ण करत असे. आर्थिक आणि सोन्याच्या रुपात होणाऱ्या सातत्याच्या मागणीला कंटाळून त्यांच्यात काही दिवसापासून वाद देखील सुरू होते. यातूनच विकोपाला गेलेल्या वादामुळे त्याने तिचा काटा काढण्याचे ठरविले होते.
शुक्रवारी सासू सोबत दवाखान्यात आल्याची संधी साधत त्याने आपल्या दुचाकीवरून तिला चंदनापुरी घाटात नेले होते. घाटात निर्जन स्थळी त्यांच्यात गप्पा सुरू असताना त्याने एका बेसावध क्षणी तिचे डोके दगडावर आपटले. यातच तिचा मृत्यू झाला. मृतदेह तेथेच ठेवले तर आपण पकडले जाऊ, या भीतीने त्याने प्लॅनिंग करत नवा बनाव तयार केला.

त्याने काही वेळ मृतदेह तेथेच लपवून ठेवत घरी आला. दुचाकी घरी ठेवत आपले चार चाकी वाहन घटनास्थळी नेले. त्यात तिचा मृतदेह टाकून महामार्गावरील टोल नाका टाळून आडमार्गाने जवळ बाळेश्वर, निमगाव, खांडगाव मार्गे संगमनेर शहरालगतच्या कासारवाडी शिवारात आला.
बाह्य वळण मार्गावरील कासारवाडी गावच्या शिवारात मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान वाहतूक शांत असल्याचा फायदा घेत त्याने तिचा मृतदेह गाडीतून खाली टाकला आणि मृतदेहाच्या अंगावरून आपले चार चाकी घेऊन गेला. त्यामुळे बघणाऱ्यांना हा अपघात वाटेल असे चित्र त्याने घटनास्थळी निर्माण केले होते. पोलिसांना शनिवारी मध्यरात्री मृतदेह आढळून आला आणि तपासाअंती या खून प्रकरणाला वाचा फुटली.

