देशभरात भारतीय जनता पक्षाची झालेली पिछेहाट ही आपल्या कर्माची फळं आहेत, असं अजूनही त्या पक्षाचे नेते मानायला तयार नाहीत. स्वत: नरेंद्र मोदींची त्यांच्या वाराणसीत झालेली पिछेहाट आणि मोदींच्या सर्वात आवडत्या मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांचा रायबरेलीत झालेला सपाटून पराभव सारं काही सांगून जातं. याच कर्मामुळे चारसौ पारचा नारा कुठल्या कुठे गुंडाळून ठेवावा लागला आणि चक्क पाऊणशे भाजप खासदारांना लोकांनी घरचा रस्ता दाखवला. सर्वच्या सर्व जागा जिंकण्याच्या आणाभाका मारणार्या योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशनेही सत्तेला जागा दाखवली. जिथे रामाची प्रतिष्ठापना झाली तिथे तर पराभव चाखाण्याची वेळ भाजपवर आली.
हाती असलेल्या सत्तेचा आतिरेक करतो, हे त्यांना मान्य नाही. सत्तेला अहंकाराने इतकं पछाडलं होतं की ज्याचं नाव ते. सत्तेप्रति लोकांचा राग स्पष्ट होता. हा अहंकार पराकोटीवर पोहोचला होता. मतदारांमध्ये निर्माण झालेल्या रागाचे अपेक्षित फटके मोदी गँगला सोसावे लागणं स्वाभाविक होतं. ही निवडणूक विरोधी पक्षांपेक्षा लोकांनीच आपल्या हाती घेतली होती. पैशांचा पाऊस पडूनही लोकांनी त्याकडे पाहिलं नाही.
महाराष्ट्र हे देशातलं असंच शुचिर्भूत राज्य. या राज्यात सर्वाधिक जागा मिळवण्याच्या राणाभीमदेवी थाटात केलेल्या घोषणा कुठल्याकुठे विरून गेल्या. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना तोंड दाखवण्याची जागा राहिली नाही. त्यांच्या विदर्भात तर गडकरींची जागा राखता राखता पक्षाला नाकीनऊ आलं. गडकरी नसते तर विदर्भात एकही जागा मिळाली नसती. फडणवीसांच्या बालेकिल्ल्याची लोकांनी केलेली अवस्था ही अशी होती. दुसरे मुंबई शहर भाजपचे बोलबच्चन अध्यक्ष अशिष शेलार यांचंही थोबाड मुंबईकरांनी रंगवून टाकलं. हे महाशय विरोधकांनी १८ जागा जिंकल्या तर राजकारणाचा म्हणे सन्यास घेणार होते. सन्यासाची आठवण करण्याची वेळ येते तेव्हा हे महाशय पत्रकार परिषदेतून पळ काढतात.
या शेलारांचं डोकं अहंकाराने तुडूंब भरलं होतं. राज्यातल्या या दारूण पराभवाला भाजपचे गर्विष्ठ आणि अहंकारी नेतेच कारणीभूत आहेत, हे कोणी वेत्याने सांगण्याची गोष्ट नाही. महाराष्ट्र हे राज्य दिल्लीतल्या सत्तेसाठी आशेचा हात होता. पण तो आघाडीने मोडीत काढला. असं का झालं याची चिकित्सा करणारे आपली चूक कधीच मान्य करत नाही. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिळावळीला झालेला पराभव मान्य नाही. पराभवाची ते नको नको ती कारणं आता पुढे करू लागले आहेत. कधी ते मुस्लिमांच्या नावाने खडे फोडतात तर कधी अजित पवारांच्या नावाचा वापर करतात. कधी मराठ्यांना जबाबदार धरतात तर कधी ओबीसींना दोष देतात. महाविकास आघाडीच्या विजयाला इतकीच कारणं असती तर नागपूरमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात मुस्लिमांची संख्या मर्यादित असूनही तिथे महाविकास आघाडीला संधी कशी मिळाली, याचा विचार भाजपने करावा.
या पराभवातील असंख्य कारणांमध्ये भाजपने विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसेना फोडीचं केलेलं पापही एक कारण आहे. यातले करते करविते फडणवीस यांना हे मान्य असण्याचा प्रश्नच नाही. पक्षात आजही तेच ताकदवान असल्याने त्यांच्या ओंजळीने पाणी पिणारे हे मान्य करतील, हे शक्यच नाही. यामुळे एका कारणासाठी असंख्य निमित्त शोधण्याचा सपाटा भाजपमध्ये सुरू आहे. दुर्देवाने यात राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदेही स्वत:ला गुरफटून घेत आहेत हे विशेष. त्यांनी पराभवाची चिकित्सा सुरू केली खरी, पण ते ही फाटाफुटीचं कारण मान्य करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या तोंडी पुन्हा एकदा शहरी नक्षवादाचा विषय काढून भाजप आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करत आहे.
२०१४ मध्ये राज्यात आलेली सत्ता निरंकुष राबवता यावी, यासाठी फडणवीस आणि त्यांच्या पाठिराख्यांनी असंख्य कारस्थानं केली. विरोधी पक्षांच्या नेत्यांना ईडी, सीबीआयकरवी अटक करायला लावली. अनेकांना तुरुंगावास घडवला. एकदोघं आत गेल्याचा अपेक्षित फायदा सत्तेला झाला. विरोधक अक्षरश: हादरून गेले. नावं घ्यावीत असे नेते पवारांची आणि उध्दव ठाकरेंची साथ सोडून गेले. त्याआधी शनिवार वाड्यापुढे झालेल्या कुठल्याशा एल्गार परिषदेचं निमित्त करत आनंद तेलतुंबडे, साईबाबा, सुधा भारद्वाज, फादर स्टेन अशा अत्यंत हुशार आणि जागतिक किर्तीच्या विचारवंतांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा अमानुष वापरत करत तुरुंगात डांबण्यात आलं. या मान्यवरांच्या विरोधात आठ वर्षांत ते नक्षल असल्याचा एकही पुरावा संबंधितांना आणि फडणवीसांच्या गृह खात्याला देता आला नाही. सत्तेसाठी मान्यावरांचं आयुष्य उदध्वस्थ करण्याचं नीच कारस्थान सत्ताधार्यांनी केलं. सत्तेला हादरे बसण्यातील काही कारस्थानांमधलं हे ही एक कारण. आताही तेच कारण सत्ताधार्यांनी पुढे केलं आहे.
महाराष्ट्रात येत्या नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा आलेख पाहाता राज्यातील सुमारे दीडशे जागा या महाविकास आघाडीला सहज मिळू शकतात, असा कल स्पष्ट दिसू लागला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत सत्तेविरोधात जाहीर प्रचारात उतरलेले सुशिक्षित पुन्हा विधानसभेच्या प्रचारात उतरले तर सत्ताधार्यांचं काही खरं नाही. हे फडणवीस चांगले ओळखून आहेत. यामुळेच फडणवीस यांच्या गृहखात्याचे बोल मुख्यमंत्र्यांच्या तोंडून वदवून सरकारविरोधी बोलणार्या विचारवंतांची मुस्कटदाबी करण्याचा सुप्त इरादा नुकताच जाहीर करून टाकला.
गृहमंत्री फडणवीस उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यात शहरी नक्षलवाद फोफावल्याचं जाहीर करत त्याचा बिमोड करण्याची भाषा वापरली. केंद्रातल्या सत्तेचा गैरफायदा घेत जे सरकारविरोधी बोलतात त्यांना ताब्यात घेण्याचं कारस्थान घडू शकतं, हेच मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतं. निखिल वागळे, निरंजन टकले, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, उलका महाजन, गडचिरोलीचा युवा कार्यकर्ता गोविंद पोलाड अशा विचारवंतांना शहरी नक्षलवादी ठरवण्याच्या हालचाली घडू शकतात, असं सरकारचं एकूणच वर्तन सांगतं. सुरक्षा कायद्याचा वापर केला की महिनोन्महिने तुरुंगवास ठरलेला असतो. बोलणार्या विचारवंतांना आत टाकलं की आपलं काम फत्ते असं सरकारला आणि ते चालवणार्यांना वाटत असेल तर ते चुकीचे इमले सजवत आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावं. लोकसभेच्या निवडणुका पार पाडल्या जात असताना तेलतुंबडे, भारद्वाज, साईबाबा हे तुरुंगातच होते. पण त्यांचा तुरुंगवास हा देशातल्या असंख्य विचारवंतांच्या डोक्यात भिनला होता. याची परिणती दिसून आली आहे.

राज्यातल्या सत्तेपुढे मोठाले खड्डे निर्माण झाले असताना पुन्हा तोच खेळ सत्ता करणार असेल तर आज दिसते त्याहून कितीतरी पटीने लोक पेटून उठतील आणि आहे ते नामोनिशानही मिटवून टाकतील, याची जाण शिंदे आणि फडणवीस यांनी ठेवावी. आहे ती सत्ता अहंकाराने वागली तर परिणामांनाही सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागते. आज सत्तेची बाजू घेणारे राज्यात ३० टक्केही नाहीत. त्यांच्या योगदानावर जे काही मिळेल त्यात समाधान मानण्याऐवजी हातात आहे, ते घालवण्याच्या मार्गावर सत्ताधारी लागलेत असंच म्हणावं लागेल.
(लेखकाचा संपर्क क्रमांक – ८१६९१३५२५३)


